मावळसह पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पवना धरण सततच्या पावसामुळे ७२ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या रिपरिपमुळे धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत आहे. त्यातून पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून धरणाच्या सांडव्यातून ४०० क्युसेक्सने पवना नदीच्या पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
यावर्षी अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीसाठा वेगाने वाढत आहे. धरणात शहराला वर्षभर पुरेल इतके पाणी जमा झाल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत ३३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे खबरदारी म्हणून ४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. १ जूनपासून धरण परिसरात १०८५ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद आहे.
पवना धरण ७२ टक्के भरले असून पाण्याची चिंता मिटली आहे. धरणातून सांडव्याद्वारे ४०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू राहिल. पुढील काळात पाऊस वाढल्यास धरणात होणाऱ्या साठ्यानुसार पाण्याचा विसर्ग साठ्यानुसार केला जाईल. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. - रजणीस बारिया, शाखाअभियंता, पवना पाटबंधारे विभाग, पवना धरण.