मालेगाव : कळवण तालुक्यातील चणकापूर धरणातून सकाळी ६ वाजता पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. सुरुवातीला ताशी २०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत असून ते हळूहळू वाढवून १००० क्युसेकपर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली. या पार्श्वभूमीवर गिरणा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीपात्रात कोणीही जाऊ नये, तसेच नदीकाठावरील पशुधन, शेतीपंप व अन्य साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संबंधित शासकीय यंत्रणांनीही आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील कसमादे भागासाठी चणकापूर धरण अत्यंत महत्त्वाचे आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध व्हावे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय सुनिश्चित व्हावी यासाठी दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान आवर्तन सोडले जाते.
जलस्तर खालावलेला
चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या या आवर्तनामुळे कसमादे परिसरातील पाण्याच्या टंचाईला काही प्रमाणात दिलासा मिळणार असला, तरीही अनेक गावांमध्ये विहिरी व बोअरवेलचा जलस्तर आधीच खालावलेला आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी दिवसांत पाण्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अद्यापही टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
