सागर कुटे
मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, धरणांमधीलपाणीसाठा वेगाने घटत आहे. जलसंपदा विभागाच्या २ मे २०२६ रोजी प्रसिद्ध ताज्या अहवालानुसार, राज्यातील ३,०२८ धरणांमध्ये आता केवळ ३८.८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
वाढत्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन आणि पाण्याचा वाढता वापर यामुळे जलसाठे तळाला जात असून, राज्यावर पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे. राज्यातील एकूण साठवण क्षमता आणि सध्याची स्थिती पाहता, उपलब्ध असलेला १५,८५८.५५ द.ल.घ.मी. पाणीसाठा आगामी मान्सून येईपर्यंत पुरवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
गतवर्षी याच काळात ३३.७६ टक्के साठा होता, त्या तुलनेत यंदाची टक्केवारी अधिक वाटत असली तरी, वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा उपसा वाढला आहे. विशेषतः ग्रामीण भागाची तहान भागवणाऱ्या लघु प्रकल्पांमध्ये केवळ ३५.८२ टक्के साठा शिल्लक राहिल्याने गावखेड्यांत पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
जलाशयांच्या पाणीपातळीत होत असलेली ही सातत्यपूर्ण घट आगामी काळात टँकरच्या संख्येत वाढ होण्याचे संकेत देत आहे. उपलब्ध साठा मर्यादित असल्याने आणि पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने आतापासूनच पाण्याचे नियोजन करणे अनिवार्य ठरत आहे.
जर मान्सूनला विलंब झाला, तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाकडून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले जात असून, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे धोरण राबवले जात आहे.
३८.८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा
राज्यातील ३,०२८ धरणांमध्ये ३८.८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मोठ्या प्रकल्पांमधील स्थिती चिंताजनक
• मोठ्या प्रकल्पांमधील स्थितीही फारशी समाधानकारक नाही. राज्यातील १३८ मोठ्या धरणांमधील साठा ३८.६७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. काही महत्त्वाच्या जलाशयांची पातळी तर अत्यंत चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे.
• सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उजनी धरणात अवधा ७.२१ टक्के साठा उरला असून, हे धरण मृत साठ्याच्या उंबरठ्यावर आहे.
• तसेच कोयना (२७.१४ टक्के) आणि विष्णूपुरी (२७.३१ टक्के) यांसारख्या प्रमुख प्रकल्पांमधील पाणीसाठा ३० टक्क्यांच्या खाली गेल्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीवरही याचे परिणाम दिसून येऊ शकतात.