उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग गुरुवारी कमी करण्यात आला. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची पाणी पातळी ओसरू लागली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एक फुटाने पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सध्यातरी संभाव्य पुराचा धोका टळला आहे.
मागील आठवड्यात पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे उजनी धरण ७६ टक्के भरले आहे. ऐन आषाढी यात्रेत चंद्रभागेला पूर येऊ नये यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उजनीतून पाणी सोडण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी योग्य नियोजन करून धरणातील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले.
सध्या पुणे जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात उसंत घेतली आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग गुरुवारी कमी केला आहे. शिवाय वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग देखील कमी केला आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे.
५२ हजार क्युसेकचा विसर्ग पंढरपुरात
गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संगम येथे भीमा नदीत ६२ हजार ३८४ क्युसेक तर पंढरपुरात ५२ हजार ५६९ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. तर चंद्रभागेची पाणी पातळी ही ४४० मीटर इतकी होती. पाणी कमी होत असल्याने आता चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.
मंदिरे पाण्यातून बाहेर येणार, वाळवंटही रिकामं होणार
दोन दिवसांपूर्वी उजनीतून भीमा नदीपात्रात ५० हजार क्युसेक तर वीर मधून ३० हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान गुरुवारी सकाळी उजनी आणि वीर धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी उजनी धरणातून भीमा नदीत २६ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. शुक्रवार सकाळपर्यंत चंद्रभागेतील मंदिरे व वाळवंट रिकामे होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप