अझहर अली
अमरावती, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वारी-भैरवगड येथे उभारलेला हनुमान सागर प्रकल्प आता शंभर टक्के क्षमतेच्या उंबरठयावर पोहोचला आहे. रविवारी रात्रीपासून प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची आवक वाढली. त्यामुळे सोमवारी सकाळी अकरा वाजता प्रत्येकी ५० सेंमी इतके दोन दरवाजे उघडण्यात आले. त्यातून वाण नदीपात्रात प्रति सेकंद ८२.७३ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सध्या धरणात ९०.८४ टक्के जलसाठा नोंदवला गेला असून, आवक व निव्वळ प्रवाह लक्षात घेऊन विसर्गात वाढ अथवा घट करण्याचा निर्णय प्रकल्प प्रशासन घेणार आहे. धरणाची जलाशय पातळी समुद्रसपाटीपासून ४१०.५२ मीटर इतकी झाली आहे. प्रकल्पात जलसाठा वाढल्याने पाण्याचा प्रश्न मिटला असून, नदीपात्रात वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाण नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
५० सेंमी दोन दरवाजे उघडण्यात आले
येत्या काही दिवसांत आणखी जोरदार पाऊस झाल्यास धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात येतील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गतवर्षीपेक्षा अधिक साठा
१ सप्टेंबर २०२४ रोजी प्रकल्पात जलसाठा ८५.२२ टक्के होता. यावर्षी तो ५.६२ टक्क्यांनी वाढून २०.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पाण्याची स्थिती समाधानकारक असून, पुढील काही दिवस आवक सुरू राहण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
पाण्याचा प्रश्न मिटला!
हनुमान सागर प्रकल्प बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील लाखो नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. या धरणातून संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, तेल्हारा आणि अकोट या पाच तालुके व शहरांना वार्षिक ३७.२०७ दलघमी पाणी अकोट आरक्षित आहे.
त्यातच आहारा ३.१६ दलघमी, शेगाव ५.६२ दलघमी, जळगाव जामोद ४.०२ दलघमी, तर संग्रामपूरसह १४० योजना आणि अकोट-तेल्हारा तालुक्यातील ८४ गावांना मिळून १२.६९३ दलघमी पाणी पुरविले जात आहे. सध्याच्या आवकेमुळे धरणाचा साठा स्थिर झाल्याने पिण्याच्या पाण्याचा तुटवडा टळला.