सटवाजी वानोळे
पारंपरिक शेतीमध्ये वाढलेला खर्च आणि अनिश्चित उत्पन्न यामुळे अनेक शेतकरी हवालदिल होत असताना वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील घोराड येथील पदवीधर असलेले प्रयोगशील शेतकरी विवेक ज्ञानेश्वर माहुरे यांनी मात्र रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग राबविला.
जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर त्यांनी केवळ अडीच एकर क्षेत्रावर रेशीम कोषाचे दर्जेदार उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
पूर्वी विवेक माहुरे कपाशी, सोयाबीन, तूर ही पिके घेत होते; परंतु खर्च वजा जाता हाती फारसे शिल्लक उरत नसायचे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न वाढू शकेल यासाठी कोणते पीक स्वीकारायचे याचा शोध विवेक माहुरे घेत होते. बी. कॉम शिक्षण झाले असल्याने इंटरनेटचे ज्ञान त्यांना होते. त्यांनी यूट्यूबवर वेगवेगळ्या शेतीबाबत शोध घेतला.
त्यात अनेक शेतकऱ्यांचे रेशीम शेतीबाबतचे व्हिडीओ त्यांनी पाहिले आणि २०१७ मध्ये रेशीमशेती करण्यास सुरुवात केली. पारंपरिक पीक हे बेभरवशाचे झाल्यामुळे व उत्पन्न मिळत नसल्याने पारंपरिक पिकाला जोडधंदा म्हणून एक एकरवर मनरेगा योजनेमधून रेशीम शेती करण्याचे ठरविले.
त्यांनी मनरेगा योजनेतील रेशीम शेतीतून सध्याच्या बाजारभावानुसार चार लाख पन्नास हजार नउशे एकसष्ट रुपयांचे विक्रमी उत्पन्न तीन महिन्यात मिळविले आहे. २०२२-२३ मध्ये त्यांना तत्कालीन वस्त्रोउद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते रेशीमरत्न पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले आहे.
७.५ लाख रुपयांचा मिळाला नव्वळ नफा
शेतकरी विवेक माहुरे सन २०१७ पासून रेशीम शेती करीत आहेत. गेल्या वर्षभरात त्यांनी २ बॅचेस काढल्या असून अंदाजे ७.५ लाख रुपयांचे खर्च वजा जाता निव्वळ नफा मिळाले आहे.
चालू वर्षात जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीनही महिन्यांचे एकूण रेशीम कोषाचे उत्पादन ६५५.७९ किलो ग्रॅम घेतले असून त्यांनी कोष विक्री कर्नाटक राज्यात रामनगरम मार्केटला करून नफा मिळविला आहे.
रेशीम शेती हा कमी कष्टात आणि शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. तरुण शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता रेशीम शेतीसारख्या जोडधंद्यांकडे नक्कीच वळावे व प्रत्येक तरुण शेतकऱ्याने किमान एक एकरमध्ये रेशीम शेती करावी. - विवेक माहुरे, शेतकरी.
