गोवर्धन चव्हाण
अकोला जिल्ह्याच्या पिंपरी खुर्द (ता. अकोट) परिसरात संत्रा बागायतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असले तरी गेल्या दोन वर्षापासून अनियमित पावसामुळे संत्रा पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे वळताना दिसत आहेत.
दरम्यान प्रगतिशील शेतकरी संजय बाळकृष्ण मानकर यांनी यंदा आपल्या अडीच एकर क्षेत्रात टरबूज लागवड करून तब्बल सुमारे १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. मानकर यांनी यावर्षी अडीच एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड केली.
या पिकासाठी लागणारी रोपे सोलापूर येथून प्रत्येकी सुमारे २.६० रुपयांच्या दराने मागविण्यात आली. पुढे योग्य पीक व्यवस्थापन करत परिपूर्ण नियोजनातून त्यांनी अपेक्षित उत्पन्न मिळविले आहे.
पर्यायी पिकाकडे कल !
टरबुजाचे पीक साधारणतः ५५ दिवसांत तयार होत असल्याने परिसरातील काही शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. मानकर यांना मिळालेल्या चांगल्या उत्पन्नामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही पर्यायी पिकांकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे.
मानकर यांनी सांगितले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे संत्रा पिकाला वारंवार फटका बसत असल्याने पर्यायी पिके घेण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी वांग्याची लागवड करूनही चांगले उत्पन्न मिळवले होते.
त्या वेळी सुमारे ६० टन उत्पादन मिळाले असून व्यापाऱ्यांनी बांधावरूनच २१ रुपये प्रतिकिलो दराने माल खरेदी केला होता.
