युनूस नदाफ
नांदेड जिल्ह्याचा अर्धापूर तालुका म्हटला की बहुतांश लोकांच्या डोळ्यांसमोर केळीचे पीक उभे राहते. बहुतांश शेतकरी केळी, हळद, ऊस व भाजीपाला पिकांची लागवड करून आपला उदरनिर्वाह साधतात. मात्र, याला एक ठळक अपवाद ठरले आहेत रोडगी येथील शेतकरी प्रकाश सीतापराव. ज्यांनी २१ वर्षांपासून दोडक्याची लागवड करून सातत्याने भरघोस उत्पन्न मिळविले आहे.
अर्धापूर तालुका हा इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात येत असल्याने शेतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. मात्र गेल्या काही वर्षात केळी पिकाला अवकाळी पाऊस, वादळी वारे व रोगराईचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. अशा परिस्थितीत पारंपरिक पिकांऐवजी वेगळा मार्ग निवडत रोडगी येथील शेतकरी प्रकाश सीतापराव यांनी दोडक्याच्या लागवडीवर भर दिला.
एक एकर क्षेत्रावर दोडक्याची लागवड करत असून, त्यातून त्यांना वार्षिक पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून दोडक्याकडे पाहिले जाते. लागवडीनंतर साधारण ५५ दिवसांत दोडके तोडणीस येतात. सदर पिकासाठी काळजी घेणे महत्त्वाचे असून, वेल वाढत असताना बांबू व तारांच्या साह्याने आधार द्यावा लागतो असे शेतकऱ्याने सांगितले.
प्रयत्न केल्यास यश पाठीमागे येते
शेतकरी बांधवांना माझे आवाहन आहे की, संपूर्ण शेतीत पारंपरिक पिके घेण्याऐवजी किमान एक एकरावर तरी काही वेगळा प्रयोग करावा. माझ्यासारखे भाजीपाला किंवा एखादे वेगळे पीक निवडून मेहनत घेतली तर यश नक्कीच तुमच्या पाठीमागे लागेल, असे शेतकरी प्रकाश सीतापराव यांनी सांगितले.
