बाळासाहेब काकडे
अहिल्यानगर जिल्ह्याच्या लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील दत्तात्रय मारुती कुंदाडे या युवा शेतकऱ्याने अहिल्यानगर-दौंड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दलदलमय जमिनीवर बहाडोली जांभळाची लागवड करून तिसऱ्या वर्षी अडीच लाख, तर चौथ्या वर्षी पाच लाख उत्पादनाची किमया केली आहे.
कृषी मंडल अधिकारी शीतल आरू, विजय केदारे, कृषी सहाय्यक केशव अनारसे, कृषितज्ज्ञ राहुल देवखिळे यांनी जांभूळ बागेला भेट दिली. कष्टातून ही बाग फुलविणारे दत्तात्रय कुंदाडे यांचे त्यांनी कौतुक केले. दत्तात्रय कुंदाडे यांना वडिलोपार्जित सहा एकर शेती असून, दोघे भाऊ कुटुंबाचा उदरनिर्वाह या शेतीवर करतात.
ओढ्याजवळ असलेल्या शेतीत पावसाचे पाणी साचले की सहा महिने पीक घेणे मुश्कील होत होते. त्यामुळे एकाच पिकावर समाधान मानावे लागत. अशा परिस्थितीत त्यांनी श्रीगोंदा येथील संतोष कोथिंबिरे यांच्या बहाडोली जातीची जांभळाची रोपे २०२१ मध्ये खरेदी केली. ती १५ गुणिले २० फूट अंतरावर लावली.
या बागेस शेणखत व रासायनिक खतांची योग्य प्रमाणात मात्रा दिली. पाण्याचे आणि मशागतीचे नियोजन केले. त्यासाठी राहुल देवखिळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. दलदलमय शेती असतानाही केवळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर दत्तात्रय कुंदाडे यांनी जांभूळ बागेची शेती यशस्वी केली.
परिसरात साऱ्यांच्या नजरा आता जांभूळ शेतीकडे वळल्या आहेत. जांभूळ हे निचरा असलेल्या जमिनीवर घ्यावयाचे पीक आहे. परंतु दत्तात्रय कुंदाडे यांनी दलदलमय शेतीत जांभूळ बागेची लागवड करून ती यशस्वी केली.
शेतीत नुकसान होत असल्याने शेती करण्याचे धाडस होत नव्हते. परंतु केशव अनारसे व राहुल देवखिळे यांचे मार्गदर्शन लाभले आणि जांभूळ शेती यशस्वी झाली. - दत्तात्रय कुंदाडे, शेतकरी, लोणी व्यंकनाथ.