सुभाष सुरवसे
जिद्द, नियोजन अन् शासकीय योजनांचा योग्य वापर केला तर शेतीतही भरघोस नफा मिळवता येतो, हे परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील दुधगाव येथील शेतकरी रानबा हरिभाऊ खरात यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांनी अवघ्या ३० गुंठ्यांमध्ये कागदी लिंबू लागवडीतून ३ लाखांचा नफा मिळवत आर्थिक प्रगती साधली आहे.
रानबा खरात यांनी आपल्या गट क्रमांक ४३ मधील १.५५ हेक्टर क्षेत्रापैकी निवडक ०.३० हेक्टर क्षेत्रात रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१४-१५ मध्ये कागदी लिंबोणीची लागवड केली. यात ११० झाडे प्रत्येकी १८ बाय १८ फूट अंतरावर लावली.
मागील चार ते पाच वर्षांपासून उत्पन्न सुरू झाले आहे. नियमित निगा, वेळेवर खतपाणी आणि बाजारपेठेचा अभ्यास यामुळे यंदा त्यांनी या झाडांमधून तब्बल ५ टन लिंबोणीचे उत्पादन घेतले. लिंबोणीला प्रतिक्विंटल ६००० रुपयांचा दर मिळाल्यामुळे त्यांचे एकूण उत्पन्न ३ लाख रुपये इतके झाले.
केवळ ३० आर क्षेत्रातून मिळालेले हे उत्पन्न इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांनी पारंपरिक पिकांबरोबरच फळबाग लागवडीवर भर दिला. हा निर्णय खरात यांच्यासाठी लाभदायक ठरला. यासाठी कृषी सहायक विश्वंभर मोकाशे, तालुका कृषी अधिकारी प्रियंका कावरे यांचेही मार्गदर्शन मिळाले.
शासकीय योजनांची जोड
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन विविध योजना राबवत आहे. या योजनांची सांगड घालून दुधगावातील रानबा खरात यांनी कागदी लिंबांची यशस्वी लागवड करून चांगले उत्पन्न मिळवले. 'राष्ट्रीय फलोत्पादन अभियान' व 'रोजगार हमी योजना'चा योग्य वापर करून आदर्शवत शेती पद्धती सादर केली आहे.
शेतीमध्ये पर्याय शोधल्यास आणि कल्पकतेने काम केल्यास नफा नक्कीच मिळतो. यासोबतच शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेत आपली प्रगती साधावी. - रानबा खरात, शेतकरी.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. फळबाग लागवडीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजनेचा मोठा हातभार मिळत असून, शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा. - प्रियंका कावरे, तालुका कृषी अधिकारी.