गोंदिया : गोंदिया तलावांचा जिल्हा आहे. मासेमारीसह जलाशय शेतीच्या सिंचनासाठीदेखील (Gondiya District) उपयुक्त आहेत. या जलाशयांचा मोती उत्पादनासाठीदेखील (Moti Production) वापर होऊ शकतो. हीच बाब ओळखून येथील एव्हर ग्रीन सोशल असोसिएशनने गोड्या पाण्यातून पर्ल शेती केली. त्याला चांगलेच यश आले असून पहिल्या मोत्यांच्या पिकातून गणेशाची प्रतिकृती साकारण्यात आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
२०२४ मध्ये नागपूर येथे झालेल्या अॅडव्हांटेज विदर्भ प्रदर्शनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यापर्यंत या संकल्पनेची माहिती दिली. या शेतीमुळे रोजगाराची संधी वाढणार असून, पाण्याचे शुद्धीकरण, पर्यावरणाचे संतुलन, हस्तकलेचे उत्पादन आणि निर्यातक्षम उद्योग यामध्येही मोठी भर पडणार आहे.
'शिंपल्यातून मोती मिळतो, पण प्रयत्नातून यश मिळते' या उक्तीला खरे करत येथील एव्हर ग्रीन सोशल असोसिएशनने मोती शेतीच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, या संघटनेने तयार केलेला पहिला मोती गणेशाच्या आकृतीचा असून तो शुद्ध गोड्या पाण्यात तयार करण्यात आला आहे. गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर गोड्या पाण्याचे तलाव, विहिरी आणि जलसाठे उपलब्ध आहेत.
या नैसर्गिक संपत्तीचा सकारात्मक उपयोग करत एव्हर ग्रीन सोशल असोसिएशनचे संस्थापक सुबोध बैस व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या सहा वर्षापासून संशोधनात्मक काम सुरू केले. सुरुवातीला अनेक अडचणी, आर्थिक चणचण, पाण्याचे नियोजन, योग्य शिंपले निवडणे यासारख्या समस्या आल्या. मात्र, या सर्व अडथळ्यांवर मात करत त्यांनी सीता संस्थेकडून घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आधारावर अभ्यास आणि प्रत्यक्ष तलावातील प्रात्यक्षिक यांचा समन्वय साधत २०२५ मध्ये पहिले पीक घेण्यास यश मिळविले.
पर्ल शेती म्हणजे काय?
मोती तयार करण्याच्या प्रक्रियेला पर्ल कल्टिव्हेशन किंवा पर्ल फार्मिंग म्हणतात. यात गोड्या अथवा खान्ऱ्या पाण्यातील विशिष्ट प्रकारच्या शिंपल्यात कृत्रिमरीत्या न्यूक्लियस (बीज/आधार) ठेवून काही महिन्यांत त्याभोवती मोती तयार होतो. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि कौशल्यपूर्ण आहे. शिंपले पाण्यात सातत्याने ठेवावे लागतात. तापमान, स्वच्छता आणि पोषण यांचे काटेकोर व्यवस्थापन आवश्यक असते.
रोजगार आणि पर्यावरणपूरक शेती
शिंपले पाण्याचे नैसर्गिक फिल्टर असतात. ते जलशुद्धीकरणात मदत करतात आणि जलपरिसंस्थेतील पर्यावरण संतुलन राखतात. त्यामुळे पर्ल शेती ही केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नाही, तर पर्यावरणपूरक शेती म्हणूनही उदयाला येत आहे. याशिवाय या शेतीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना, महिला बचतगटांना, युवकांना, हस्तकला उत्पादकांना थेट रोजगाराच्या संधी प्राप्त होतात.