नितीन कांबळे
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा गाव. दुष्काळी पट्टा, पाण्याची टंचाई आणि शेतीतील अनिश्चितता हेच या भागाचे वास्तव. अशा परिस्थितीत बहुतांश तरुण नोकरीच्या शोधात शहरांकडे वळतात. (Ginger Farming Success Story)
मात्र कडा येथील दोन उच्चशिक्षित भावंडांनी नोकरीच्या मागे धावण्याऐवजी शेतीतच स्वतः चे भविष्य घडवण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या अडीच एकर क्षेत्रात आल्याची लागवड करून तब्बल २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आर्थिक क्रांती घडवून आणली.(Ginger Farming Success Story)
गणेश सोनवणे यांनी एम.एस्सी. ॲग्री, तर त्यांचे भाऊ शिवाजी सोनवणे यांनी बी.एस्सी. अॅग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर चांगली नोकरी मिळेल, अशी अपेक्षा होती.
मात्र स्पर्धा, अनिश्चितता आणि लाखो रुपयांची गुंतवणूक करूनही नोकरीची हमी नसल्याने त्यांनी शेतीतच काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला.
कांदा शेतीने दिला तोटा
सोनवणे बंधू पारंपरिक पद्धतीने कांदा आणि इतर पिकांची शेती करत होते. मात्र वाढता उत्पादन खर्च, बाजारातील चढ-उतार आणि अपेक्षित दर न मिळाल्याने कांदा शेतीतून सातत्याने तोटा होत होता. अनेकदा खर्चही निघत नसल्याने त्यांनी पर्यायी पिकांचा अभ्यास सुरू केला.
याच दरम्यान कमी पाण्यावर आणि चांगले आर्थिक उत्पन्न देणारे पीक म्हणून आल्याची माहिती त्यांना मिळाली. फक्त ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
राज्यभर फिरून घेतली माहिती
छत्रपती संभाजीनगर, सातारा, जालना आणि फुलंब्री भागातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देत त्यांनी आल्याच्या शेतीचे बारकावे समजून घेतले.
बेड पद्धती, ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन, रोगनियंत्रण आणि बाजारपेठ यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी आल्याची शेती करण्याचा अंतिम निर्णय घेतला.
यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून 'माहिम' जातीचे २,७०० किलो बियाणे खरेदी करण्यात आले. अडीच एकर क्षेत्रात पाच फूट रुंदीचे ७५ बेड तयार करून आधुनिक पद्धतीने लागवड करण्यात आली.
कांद्यावर फिरवला रोटर
आल्याची शेती करण्यासाठी त्यांनी धाडसी निर्णय घेत अडीच एकरातील उभ्या कांदा पिकावर थेट रोटर फिरवला. अनेकांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी मागे न हटता नवीन प्रयोगावर विश्वास ठेवला.
ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले. फवारणी, खत व्यवस्थापन आणि वेळोवेळी निगा राखत संपूर्ण पीक सांभाळण्यात आले.
बियाणे, मजुरी, खत, औषधे आणि काढणी असा एकूण सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च झाला.
मेहनतीचे मिळाले सोनं
सुमारे दहा महिन्यांच्या मेहनतीनंतर शेतातून ४०० ते ४२५ क्विंटल आल्याचे उत्पादन मिळाले. बंगळुरू आणि छत्रपती संभाजीनगर बाजारपेठेत प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत दर मिळाल्याने त्यांना तब्बल २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
कमी पाण्यावर, कमी क्षेत्रात आणि मर्यादित खर्चात मिळालेल्या या मोठ्या यशामुळे परिसरातील शेतकरीही आता आल्याच्या शेतीकडे वळू लागले आहेत.
'शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहा'
शेतीत जिद्द, सातत्य आणि योग्य नियोजन असेल तर आर्थिक क्रांती घडवता येते. पारंपरिक पद्धतीत अडकून न राहता बाजारपेठेचा अभ्यास करून आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. - गणेश सोनवणे, शेतकरी
सोनवणे बंधूंची ही यशोगाथा केवळ आर्थिक यशाची नाही, तर शिक्षित तरुणांनी शेतीकडे नव्या दृष्टीने पाहिल्यास शेतीही करोडोंची संधी निर्माण करू शकते, याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
