अनिल महाजन
शेतीत यश मिळवण्यासाठी मोठी जमीन किंवा भरपूर भांडवलच लागते, ही समजूत खोटी ठरवत आरणवाडी येथील शेतकरी महादेव श्रीराम माने यांनी अवघ्या ३५ ते ४० गुंठे क्षेत्रात मिरचीशेती करून उल्लेखनीय यश मिळवले आहे. (Farmer Success Story)
बदलत्या हवामानाचा फटका, बाजारातील दरघसरण अशा अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी केवळ ५ महिन्यांत तब्बल ६ लाखांचे उत्पन्न मिळवत एक आदर्श निर्माण केला आहे.(Farmer Success Story)
कमी क्षेत्रात मोठं यश
महादेव माने यांनी 'दबंग' वाणाची मिरची लागवड करत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली. कमी क्षेत्रातही योग्य तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन वापरल्यास मोठे उत्पादन मिळू शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.
पाणी व्यवस्थापन ते पोषण सर्व काही नियोजनात
माने यांनी शेतीत खालील बाबींवर विशेष भर दिला
ठिबक सिंचनाद्वारे अचूक पाणी व्यवस्थापन
संतुलित खतांचा वापर
वेळोवेळी कीटकनाशक व बुरशीनाशक फवारणी
सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता
पिकाची त्यांनी अक्षरशः लेकरासारखी काळजी घेतली. या सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच उत्पादनात मोठी वाढ झाली.
उत्पादन आणि उत्पन्नाचा हिशोब
एकूण क्षेत्र : ३५–४० गुंठे
उत्पादन (आतापर्यंत) : १० टन
अपेक्षित अतिरिक्त उत्पादन : ५ टन
एकूण खर्च : सुमारे २ लाख रुपये
एकूण उत्पन्न : सुमारे ६ लाख रुपये
दर घसरले, तरी हार नाही मानली
मिरचीला सुरुवातीला ५०–६० रुपये प्रति किलो दर मिळाला. मात्र नंतर हा दर २० रुपयांपर्यंत खाली आला. तरीही माने खचले नाहीत. त्यांनी विविध बाजारपेठांचा पर्याय निवडत लातूर, माजलगाव, वडवणी आणि किल्ले धारूर येथे विक्री करून उत्पन्न टिकवून ठेवले.
संकटांवर मात
अतिवृष्टी, बदलते हवामान, बाजारातील चढ-उतार या सर्व अडचणी असूनही त्यांनी जिद्द सोडली नाही. परिस्थितीशी जुळवून घेत सातत्य ठेवले आणि त्याचेच यशस्वी फळ मिळाले.
इतर शेतकऱ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन
महादेव माने यांच्या यशातून शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे धडे मिळतात.
पिकाची निवड करताना बाजारपेठेचा अभ्यास करा
ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा
खत व औषधांचे संतुलन राखा
उत्पादन विक्रीसाठी विविध बाजारपेठांचा विचार करा
सर्वात महत्त्वाचे जिद्द आणि सातत्य कधीही सोडू नका!
शेतीत यश मिळते
शेतीत यश मिळवण्यासाठी केवळ जमीन नाही, तर योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि मेहनत महत्त्वाची असते. त्यांच्या या यशोगाथेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळत आहे.- महादेव माने, शेतकरी
