जगन्नाथ कुंभार
मसूर : शेतीत विविध प्रयोग करून चांगले उत्पादन काढता येते हे अनेक शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.
अशाच प्रकारे कराड तालुक्यातील केंजळ-कवठे येथील सचिन केंजळे यांनी फक्त ३२ गुंठ्यांमधील सोयाबीन पिकाचे तीन महिन्यांच्या कालावधीत विक्रमी असे साडेसोळा क्विंटल उत्पन्न घेऊन ९० हजार रुपये मिळवले आहेत.
विशेष म्हणजे उसात त्यांनी हे आंतरपीक घेतले होते. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे त्यांचा एक आदर्श निर्माण झाला आहे. सचिन केंजळे यांनी आपल्या माळरानाच्या शेतीत ऊस तुटून गेल्यानंतर पाचट कुटी केली.
त्यानंतर शेणखतावर प्रक्रिया करून आठ टेलर शेणखत टाकले व सरी सोडण्यापूर्वी बेसल डोस टाकला. पाच फुटांची सरी सोडली.
यानंतर रासायनिक खताच्या १०:२६ दोन पोती पोटॅश, १ पोतं अमोनिया सल्फेट, २५ किलो अमोनियम सल्फेट या मात्रा देऊन कीडीएस ७२६ जातीचे सोयाबीनचे बी सात इंचाच्या अंतरावर टोकणी केले.
टोकणी केल्यावर २१ दिवसानंतर जी बूस्टर, बी बूस्टर, ग्रीन एक्स, ग्रोस या चार फवारण्या केल्या. याच शेतामध्ये सोयाबीनची उगवण झाल्यानंतर पंधरा दिवसांतच ऊस रोप लागण केली.
विक्रमी उत्पन्न घेण्याचे ठरवलेले ध्येय गाठले
◼️ सोयाबीनचे उत्पन्न चांगले यावे यासाठी मसूरचे शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. जेष्ठराज जोशी यांनी मसूरमध्ये शेतकरी मेळावा घेऊन यामध्ये शस्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यास तुम्ही विक्रमी उत्पन्न घेऊ शकता, असे सांगितले होते.
◼️ त्याचवेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीनचे विक्रमी उत्पन्न घेण्याचे ध्येय निश्चित केले होते. यासाठी डॉ. जेष्ठराज जोशी, स्वप्नील सूर्यवंशी, दीपक वांगीकर, दिनकर घोलप यांचे मार्गदर्शन मिळाले.
शेतकरी शेतीत विविध पिके घेतात; पण या पीकपद्धतीला आधुनिकतेची जोड द्यावी. आंतरपिकेही घ्यावीत त्यातून खर्चही कमी होऊन फायदा अधिक होतो. अशाच प्रकारे मी कमी क्षेत्रातील सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन घेण्यात यशस्वी झालो. यापुढेही माझा शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न राहील. - सचिन केंजळे, प्रगतिशील शेतकरी, केंजळ-कवठे
अधिक वाचा: तुमच्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किती आहे? ते किती असणे आवश्यक आहे? वाचा सविस्तर
