Join us
Daily Top 2Weekly Top 5

आंबा पिकातील फळगळ व पुन्हा मोहोर येण्याची समस्या टाळण्यासाठी करा 'ह्या' महत्वाच्या फवारण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:02 IST

कोकणातील जांभ्या जमिनीत अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी शिफारस केलेल्या खतांचा अवलंब करून हापूस आंब्याचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्रशक्ती या विद्राव्य निविष्ठेच्या तीन फवारण्या कराव्यात.

कोकणातील जांभ्या जमिनीत अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी शिफारस केलेल्या खतांचा अवलंब करून हापूस आंब्याचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्रशक्ती या विद्राव्य निविष्ठेच्या तीन फवारण्या कराव्यात.

आम्रशक्ती द्रावण तयार करण्यासाठी प्रति १०० लिटर पाण्यात ०.५% (५०० ग्रॅम प्रत्येकी) युरिया, सल्फेट ऑफ पोटॅश व सिंगल सुपर फॉस्फेट अधिक ०.२५% (२५० ग्रॅम प्रत्येकी) झिंक सल्फेट, बोरॅक्स व कॉपर सल्फेट अधिक ०.०९% (९० ग्रॅम) सोडियम मॉलिब्डेट मिसळावे.

या फवारण्या अनुक्रमे बोंगे फुटण्याच्या अवस्थेत (मोहोर फुटण्याच्या अवस्थेत), बहरलेल्या मोहोरावर आणि फळे सुपारी ते अंड्याएवढी झाल्यावर कराव्यात.

हापूस आंबा पिकामध्ये फळगळ कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी व साक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एन् ऐटका (n ATCA १० टक्के) आणि फॉलिक अ‍ॅसिड (०.२० टक्के) घटक असलेल्या द्रावणाची फवारणी अनुक्रमे ५० टक्के मोहर फुलल्यावर (१मिली/लि.), फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर (१.५ मिली/लि.), फळाचा आकार अंडाकृती झाल्यावर (२) मिली/लि.) करावी.

किमान तापमान सातत्याने कमी राहिल्यास, आधीच मोहोर आलेल्या किंवा आधीच फळे धरलेल्या फां‌द्यांवर पुन्हा नवीन मोहोर येण्याची शक्यता असते. यामुळे अन्नद्रव्यांचा प्रवाह नवीन मोहोराकडे वळून जुन्या मोहोरावरील वाटाणा किंवा गोटी आकाराच्या फळांची गळ होऊ शकते.

ही पुन्हा मोहोर येण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी जिब्रेलिक असिड (GA,) ५० पी.पी.एम. (१ ग्रॅम प्रति २० लिटर पाणी) या संजीवकाची फवारणी करण्याची शिफारस करण्यात येते.

ही फवारणी झाडावर पुरेसा मोहोर आल्याची खात्री झाल्यानंतरच करावी. जिब्रेलिक अ‍ॅसिडची फवारणी मोहोर पूर्ण उमललेला असताना एकदा तसेच फळे मोहरीच्या दाण्याच्या आकाराची झाल्यावर पुन्हा एकदा करावी.

जिब्रेलिक अ‍ॅसिड पाण्यात अविद्राव्य असल्याने प्रथम ते थोड्या प्रमाणात अल्कोहोलमध्ये विरघळवून नंतर आवश्यक त्या प्रमाणात पाण्यात चांगले मिसळून फवारणी करावी.

आंबा पिकामध्ये मोहोर आल्यानंतर फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत असताना १% पोटेशियम नायट्रेट (१० ग्रम प्रति लिटर पाणी) याच्या तीन फवारण्या कराव्यात. पालाश अन्नद्रव्यामुळे फळांचे वजन व आकार वाढण्यास मदत होते तसेच फळांची गुणवत्ता सुधारते.

यामुळे साखर व आम्लता यांचे प्रमाण संतुलित राहून फळांच्या सालीसह आतील गराला आकर्षक रंग प्राप्त होतो. याशिवाय फळांचा टिकाऊपणा वाढतो व फळातील साक्याचे प्रमाण कमी होते.

दमट हवामानामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ५ मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

(आम्रशक्ती ही निविष्ठा तयार स्वरूपात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे उपलब्ध आहे. आम्रशक्ती निविष्ठेबाबत अधिक माहितीसाठी पुढील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा ९८२२८९९०६८)

अधिक वाचा: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? अशा पनीरचे मानवी आरोग्यावर काय होतात दुष्परिणाम? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Mango fruit drop & re-flowering? Essential sprays for healthy yield!

Web Summary : Control mango fruit drop and re-flowering with Amrashakti sprays, NAA, folic acid, and potassium nitrate. Use Gibberellic acid to prevent re-flowering. Manage blight with Hexaconazole or sulfur. Contact for Amrashakti.
टॅग्स :आंबाफळेफलोत्पादनकीड व रोग नियंत्रणपीक व्यवस्थापनकोकणहवामान अंदाज