सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीमध्ये असणारा एकूण पालापाचोळा, शेणखत, सेंद्रिय खताचा वापर, जमिनीत मिसळणारे पिकांचे अवशेष यांचे योग्य प्रमाण म्हणजे अशा प्रकारची जमीन सेंद्रिय कर्बयुक्त असल्याचे म्हटले जाते.
पण, सेंद्रिय कर्ब कमी होण्याची अनेक कारणे आहेत. हे समजून घेतले तर पिकांतून चांगले उत्पादन मिळवता येते.
सेंद्रिय कर्ब कमी होण्याची कारणे
◼️ पीक पद्धतीमध्ये जास्तीत जास्त नत्र खतांची गरज असलेली पिके घेणे. उदा. ऊस, भात, आले.
◼️ पिकांचा फेरपालट न करणे. म्हणजेच एकदलनंतर द्विदल पिके न घेणे अथवा जमिनीला विश्रांती न देणे.
◼️ रासायनिक खते व कीटकनाशकांचा माती परीक्षणाशिवाय वापर करणे.
◼️ मातीमध्ये कीटकनाशकांचा व तणनाशकांचा अयोग्य पद्धतीने वापर.
◼️ पिकांचे अवशेष जाळणे उदा. ऊस पाचट.
◼️ जास्त खोल नांगरट केल्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब उष्णतेमुळे हवेत निघून जातो.
◼️ जमिनीमध्ये पाणी मुरण्याची क्षमता कमी होणे.
◼️ चराऊ तसेच गवताळ जमिनीचे प्रमाण कमी होणे.
सेंद्रिय कर्ब वाढल्याचे फायदे
◼️ जमिनीची सुपीकता वाढते.
◼️ अर्थातच जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीचे अन्नद्रव्य शोषून घेण्याची प्रक्रिया सुरळीत पार पाडून उत्पादकता वाढण्यास मदत होते.
◼️ जमिनीची जलधारणशक्ती वाढते.
◼️ सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जमिनीमध्ये हवेचे आवश्यक प्रमाण संतुलित होते.
◼️ यामुळे जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून पिकांना आवश्यक त्यावेळी पाणी उपलब्ध होते.
◼️ अन्नद्रव्य उपलब्धतेसाठीही मदत होते.
◼️ जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारल्यामुळे जमीन भुसभुशीत होते.
◼️ जमिनीमधील जैविक व रासायनिक क्रिया सहजपणे घडून येतात.
- सुनील यादव
कृषी अधिकारी
जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी कार्यालय, सातारा
अधिक वाचा: कमी कालावधीमध्ये सशक्त व निरोगी भाजीपाला रोपे तयार करायचीत? करा 'या' तंत्राचा वापर
