Agriculture News : वेलवर्गीय भाज्या उदा. कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी, पडवळ या पिकांना वाढीच्या काळात आधार दिल्यास त्यांची वाढ चांगल्याप्रकारे होते. त्यासाठी मंडप किंवा ताटी पद्धती वापरून वेलींना आधार दिला जातो.
दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळविण्याकरिता वेलींना मंडप किंवा तारेच्या साह्याने वाढविणे गरजेचे असते. आधार दिल्यामुळे नवीन येणाऱ्या फुटींना वाढीसाठी सतत चांगला वाव मिळत राहतो. त्यामुळे फळधारणा चांगली होते. याउलट जमिनीवर पहिले काही फुटवे आल्यानंतर नवीन फुटवे येत नाहीत आणि वेली केवळ एकदाच फळे देतात.
मंडपावर चढविलेल्या वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात, तर जमिनीवर केवळ ३ ते ४ महिनेच चांगल्या राहतात. मंडपावर किंवा ताटीवर फळे लोंबकळत राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश एकसारखा मिळत असल्यामुळे फळांचा रंग एकसारखा आणि चांगला राहतो. फळांचा जमिनीसोबत संपर्क होत नाही.
त्यामुळे ओलावा लागून फळ सडण्याचा धोका टाळला जातो. शिवाय कीड व रोगांचे प्रमाणही कमी राहते. फळांची तोडणी, रासायनिक फवारणी ही कामे करणे सुलभ होते. आंतरमशागतीवरील खर्च कमी होतो. वेल मंडपावर पोहोचेपर्यंत दीड ते दोन महिन्यांचा कालावधी जातो. या काळात या पिकांमध्ये पालेभाज्यांसारखी मिश्रपिके घेता येतात.
कांद्याला बाजूला सारलं, एका एकरात बीटाची शेती, 65 दिवसांत सव्वा लाखांचे उत्पन्न, कसं केलं नियोजन?
