Wheat Management : राज्यात सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून बहुतांश ठिकाणी हार्वेस्टरद्वारे काढणी सुरू आहे. (Wheat Management)
मात्र काढणीनंतर शेतात उरलेल्या गव्हाच्या काडाचे काय करायचे, याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. काड जाळून टाकायचे की जमिनीत गाडायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.(Wheat Management)
सध्या सुमारे ९० टक्के शेतकरी हार्वेस्टरने काढणी करतात. या प्रक्रियेत गव्हाचा फक्त ३० ते ४० टक्के भाग कापला जातो, तर उर्वरित ६० ते ७० टक्के काड शेतातच राहते. (Wheat Management)
एका एकरात साधारण दीड ते दोन टन काड उरते. हे काड लगेच कुजत नसल्याने अनेक शेतकरी ते जाळण्याचा पर्याय निवडतात.(Wheat Management)
मात्र कृषी संशोधक डॉ. अनंत इंगळे यांच्या मते, काड जाळल्यामुळे जमिनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि मित्रकिडे नष्ट होतात, वरचा थर कडक होतो आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटते. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होण्याचा धोका निर्माण होतो.
काड गाडणे का महत्त्वाचे?
जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि दीर्घकालीन उत्पादन वाढीसाठी काड जमिनीत गाडणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. काड जमिनीत मिसळल्याने सेंद्रिय पदार्थ वाढतात आणि जमिनीचा पोत सुधारतो.
तथापि, काड गाडण्याची प्रक्रिया योग्य वेळी करणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील पीक घेण्याच्या किमान ५५ ते ६० दिवस आधी काड जमिनीत गाडले, तरच त्याचे पूर्णपणे खतात रूपांतर होते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
कधी जाळणे पर्याय ठरू शकतो?
ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता नाही, जमिनीत ओलावा नाही किंवा पुढील पिकासाठी वेळ कमी आहे, अशा परिस्थितीत काड जाळून तातडीने नांगरणी करणे काही प्रमाणात व्यवहार्य ठरू शकते. मात्र हा पर्याय केवळ अपवादात्मक परिस्थितीतच वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
काड कुजवण्यासाठी काय करावे?
गव्हाच्या काडाचे जलद विघटन करण्यासाठी खालील उपाय उपयुक्त ठरतात
* काढणीनंतर रोटाव्हेटरने काड बारीक करून घ्यावे
* शेतात पुरेसा ओलावा राखावा किंवा पाणी द्यावे
* डीकंपोझिंग कल्चर (कुजवणारे जिवाणू) टाकावेत
* १० ते १२ दिवसांनी नांगरणी करावी
या प्रक्रियेमुळे काड लवकर कुजते आणि जमिनीत सेंद्रिय अन्नद्रव्ये वाढतात.
नत्र व्यवस्थापनही गरजेचे
गव्हाच्या काडामध्ये कर्बाचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे कर्ब-नत्र गुणोत्तर जास्त असते. त्यामुळे कुजण्याच्या प्रक्रियेत जिवाणूंना जास्त नत्राची गरज भासते आणि ते जमिनीतील नत्र वापरतात. परिणामी पुढील पिकाला नत्राची कमतरता जाणवू शकते. यासाठी काड गाडताना अतिरिक्त नत्राचा पुरवठा करणे आवश्यक आहे.
जनजागृतीची गरज
काड जाळण्याचे दुष्परिणाम लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये याबाबत अधिक जनजागृती करणे गरजेचे आहे. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काड गाडण्याचा पर्याय स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गव्हाच्या काडाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास ते कचरा नसून खताचा उत्तम स्रोत ठरू शकतो. त्यामुळे जाळण्याऐवजी गाडणे हाच शाश्वत आणि फायदेशीर मार्ग आहे.
