अमरावती : मिरचीद्वारे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. भर उन्हाळ्यात म्हणजेच १५ एप्रिलनंतर मिरची रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, उन्हाळ्यातील वाढता पारा आणि पाणी व्यवस्थापनाचे गणित चुकल्यास हे पीक जिकरीचे ठरते. मिरचीचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी केवळ बियाणे चांगले असून चालत नाही, तर रोपांची गुणवत्ता सर्वात महत्त्वाची असते.
अनेकदा नर्सरीमध्ये रोपांची उंची रोखण्यासाठी किंवा वाढ करण्यासाठी वापरली जाणारी रसायने भविष्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करू शकतात, असा इशारा कृषी संशोधकांनी दिला आहे. अनेक नर्सरी चालक रोपांची वाढ रोखण्यासाठी 'ग्रोथ रेग्युलेटर'चा वापर करतात किंवा ती लवकर मोठी व्हावीत म्हणून अतिप्रमाणात टॉनिक देतात.
यामुळे रोपांचे नैसर्गिक हार्मोनल संतुलन बिघडते. अशी रोपे दिसायला चांगली असली, तरी शेतात लावल्यानंतर त्यांची वाढ खुंटते आणि व्हायरसचा प्रादुर्भाव लवकर होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोप घेताना ते नैसर्गिकरीत्या वाढलेले आहे का, याची खात्री करणे आवश्यक आहे.
लागवडीपूर्वी रोपे व कीटकनाशक बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावीत. नर्सरीमध्ये कोकोपीट वापरताना त्यात बुरशीनाशकाचा वापर अनिवार्य आहे. तसेच, ह्युमिक किंवा अमिनो अॅसिडचा वापर मर्यादित ठेवून रोपाची मुळे गुंडाळणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
मिरचीच्या रोपांची ओळख शेतकऱ्यांनी कशी करावी ?
लागवडीपूर्वी बेड ४ ते ५ दिवस आधी ओलावून घ्यावा. उन्हाळ्यात मल्चिंग पेपरच्या आत उष्णता तयार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. रोपांची लागवड नेहमी सायंकाळच्या वेळी करावी जेणेकरून उष्णतेचा ताण कमी बसेल.
लागवडीसाठी रोप २७ ते ३५ दिवसांचे आणि रोगमुक्त असावे. ४५ दिवसांपेक्षा जास्त वयाची रोपे लावू नयेत. रोपाचे खोड जाड व मजबूत असावे. योग्य नियोजनामुळेच मिरचीचे विक्रमी उत्पादन शक्य असल्याचे कृषी संशोधक डॉ. अनंत इंगळे यांनी स्पष्ट केले आहे.
गादी वाफ्यावरील रोपांना द्यावे प्राधान्य
नर्सरीतील रोपे खात्रीशीर वाटत नसल्यास शेतकऱ्यांनी स्वतः गादी वाफ्यावर रोपे तयार करण्याला प्राधान्य द्यावे. यामुळे खर्च कमी होतो आणि रोपे अधिक तगडी होतात. गादी वाफ्यावरील रोपे शेतातील वातावरणाशी लवकर जुळवून घेतात आणि त्यांच्यावर रोगांचा प्रादुर्भाव कमी जाणवतो. उन्हाळ्यात ३५ ते ४० दिवस आधी, तर पावसाळ्यात ३० ते ३२ दिवस आधी बियाणे टाकणे योग्य ठरते.
पचनसंस्था सुधारते, वजन कमी करते, साखरेवर नियंत्रण ठेवते, 'ही' भाकर आहारात असायलाच हवी!
