Krushi Salla : सध्या बाजरी आणि भुईमूंग काढणीच्या (Bhuimung Kadhani) अवस्थेत असून अवकाळी पाऊस (Avkali Paus) सुरु असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ होते आहे. अशातच दोन्ही पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. परिणामी या काळात या दोन्ही पिकांचे व्यवस्थापन कसे करावे? हे समजून घेऊयात...
बाजरी पिकासाठी सल्ला
- बाजरी पिकावर येणाऱ्या किडींच्या नियंत्रणाबाबत पुर्णपणे दुर्लक्ष केले जाते.
- या पिकावर पडणाऱ्या केसाळ अळी, खोड किडा व सोसे अथवा हिंगे, बिनपंखी टोळ अथवा नाकतोडे या किडींच्या प्रादुर्भावामुळे ५० ते ६० टक्के उत्पन्नात घट होऊ शकते.
- त्यासाठी योग्य वेळी नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे ठरते.
- बाजरी पिकावरील केसाळ अळी, सोसे/हिंगे या किडींच्या नियंत्रणासाठी वारा शांत असताना कणसांवर मिथिल पॅराथिऑन (२%) ८ किलो प्रति एकरी धुरळणी करावी. (पावसाचा अंदाज लक्षात घेता स्वच्छ हवामान दरम्यानच सदरील कामे करावीत)
भूईमूंग पिकासाठी सल्ला
- भुईमुगाच्या शेंगा भरत असताना आकार व वजन वाढण्यासाठी सल्फेट ऑफ पोटॅश (०:०:५०) ७५ ग्रॅम अधिक मल्टी सूक्ष्म अन्नद्रव्य ५० ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- सद्यस्थितील हवामानामुळे भुईमुग पिकावर पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव दिसताच क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मिली किंवा लॅमडा साह्यलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
- गरजेनुसार शिफारसीत कीटकनाशकांच्या सदर फवारण्या कराव्यात.
- (पावसाचा अंदाज लक्षात घेता स्वच्छ हवामान दरम्यानच सदरील कामे करावीत)
नाशिक जिल्ह्यात हवामान कसे राहील?
पुढील दोन दिवसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात दि. १९ ते २१ मे २०२५ दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आकाश पुढील दोन दिवस ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३३-३४ डिग्री सें. व किमान तापमान २३-२५ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वा-याचा वेग ७-११ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.