Paddy Farming : खरीप हंगामातील (Kharif Season) भात पिकाच्या लागवडीला (Paddy Cultivation) सुरवात झाली असून काही भागात पावसाची प्रतीक्षा होती. त्या ठिकाणी देखील पावसाचे आगमन झाल्यानंतर भात लागवडीला सुरवात झाली आहे. त्यामुळे भात रोपे काढणी, लावणी आदी कामे सुरु झाली आहेत. एकूणच या काळात भात पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन (Paddy Farming) करणे आवश्यक असते. ते समजून घेऊया....
मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता सल्ला देण्यात येतो कि भात रोप वाटिका (Bhat sheti) व पुनर्लागवड केलेल्या क्षेत्रातून जास्तीचे पाणी काढून टाकण्याची व्यवस्था करावी. पावसाचा अंदाज व पाण्याच्या उपलब्धतेनुसार भाताची पुनर्लागवड पुढे चालू ठेवावी. भात शेतीमध्ये पुनर्लागवडीनंतर दोन ते तीन बेनण्या (खुरपणी) कराव्या. भात खाचरात ५ ते ६ सेमी पाणी साठवून स्थर होईपर्यंत उत्कृष्ठपणे तण नियंत्रण करता येते. खाचरात पिकाच्या योग्य वाढीसाठी रोपे लागणीपासून रोपे स्थिर १ ते २ सेमी पाण्याची पातळी असावी.
रोपांच्या पुनर्लागवडीसाठी पारंपारिक पद्धतीने अथवा यंत्राच्या सहाय्याने चिखलणी करावी. हळव्या जातींची लागण पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी, निमगरव्या जातींची २३ ते २७ दिवसांनी व गरव्या जातींची २५ ते ३० दिवसांनी करावी, एका चुडात ३ ते ४ रोपे ठेवावीत हळव्या जातींची रोपांची लावणी १५ x २५ सेमी तर निमगरव्या व गरव्या जातींची लावणी २० x १५ सेमी वर करावी. भात पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी चारसूत्री भात लागवड तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. हे तंत्र सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकूण लागवडीतील बी, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती फायदेशीर करणारे आहे.
चारसुत्रापैकी पहिले सूत्र १- रोपवाटीकेसाठी वापरावे जसे भाताच्या तुसाची काळसर राख रोपवाटिकेत बी पेराण्यापुर्वी गादी वाफ्यात मिसळावी. खात्रीशिर व भेसळविरहीत बियाण्यांचा वापर करावा.
सूत्र : २- वनशेती तंत्रज्ञानाचा उपयोग करून गिरिपुष्प या हिरवळीच्या खताचा एकरी ८.१२ क्विटल वापर
दोन-चार गिरिपुष्पाच्या झाडाची हिरवी पाने (अंदाजे ३० कि. ग्रॅ./ गुंठा) चिखलणीपूर्वी सहा-आठ दिवस अगोदर खाचरात पसरावीत, नंतर चिखलणी करून रोपाची लावणी करावी. ज्या शेतकऱ्यांना गिरिपुष्प उपलब्धतेमध्ये अडचणी आहेत, त्यांनी ताग, धैंचा अशी हिरवळीची पिके जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरावीत. ती चिखलणीवेळी गाडून घ्यावीत. त्यानंतर भातरोपांची पुनर्लागवड करावी.
सूत्र : ३- सुधारित किंवा संकरित जातीच्या भातरोपांची (२५ चूड/ चौ.मी.) नियंत्रित लावणी
अधिक उत्पादनासाठी बुटक्या, जास्त फुटवे देणाऱ्या सुधारित अथवा संकरित भातजातीचा वापर करावा. भात तुसाची काळी राख रोपवाटिकेमध्ये वापरून तयार केलेली रोपे (उगवणीपासून अंदाजे तीन आठवड्यांनी) लागवडीसाठी वापरावीत. शेताच्या बांधाजवळून लागवडीस सुरुवात करावी सुधारित लागवड दोरीवर १५ सें.मी. अंतरावर असलेल्या प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा (प्रत्येकी २-३ रोपे/चूड) त्यानंतर २५ सें.मी. पुढे आणखी तिसरा व १५ सें.मी. अंतरावर चौथा चूड लावावा. अशाप्रकारे एकावेळी जोड ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत नियंत्रित लागवड पूर्ण करावी. खाचरात अनेक १५ x १५ सें. मी. बुडांचे चौकोन व २५ सें.मी. चालण्याचे रस्ते तयार होतात.
सूत्र : ४- खतगोळ्या खोचणे
नियंत्रित पुनर्लागवडीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅमची एक युरिया-डीएपी ब्रिकेट हाताने ७.१० सें.मी. खोल खोचावी. एक गुंठा क्षेत्रात ६२५ ब्रिकेट्स (१.७५ कि. ग्रॅ.) पुरतात. यातून मिळणाऱ्या खताची मात्रा (एकरी) २३ कि. ग्रॅ. नत्र अधिक ११.७ कि. ग्रॅ. स्फुरद इतकी असते. पावसाच्या अभावी व इतर कारणाने लागवड लांबणीवर पडल्यास प्रति गुंठा क्षेत्रातील रोपास १ किलो युरियाचा तिसरा हफ्ता द्यावा. योग्य पाणी व्यवस्थापन करावे. कीड व रोग नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.
रासायनिक तण नियंत्रण
रासायनिक तण नियंत्रणासाठी २० ग्रॅम मेटसल्फुररॉन मिथाईल १० टक्के क्लोरोम्युरॉन इथाईल १० टक्के तयार मिश्रण ०.००४ किलो क्रियाशील घटक प्रती हेक्टरी ५०० लीटर पाण्यात पुनर्लागवडीनंतर १५ ते २० दिवसांत फवारावे व त्यानंतर ४५ व्या दिवशी एक खुरपणी करावी. पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता पाण्याच्या उपलब्धतेनुसार पेरलेल्या रोपवाटीकेतील रोपांची पुनर्लागवडी पूर्वी रोपांची मुळे क्लोरोपायरीफॉस २० ई.सी. ०.०२% + १% युरियाच्या द्रावणात ४ तास बुडवून ठेवावीत. भात लावणीच्या वेळी रोपांचे शेंडे खुडावेत. त्यावरील किडींचे अंडीपुंज, अळ्या गोळा करून त्यांचा नाश करावा. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी मिथील पॅराथिऑन २ % (हेक्टरी २० किलो) भुकटी धुरळावी. (पावसाचा अंदाज घेऊनच फवारणीचे कामे करावीत)
संकलन : विभागीय संशोधन केंद्र आणि ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्र , इगतपुरी
