Agriculture News : उन्हाळी बाजरी आणि भुईमूग वाढीच्या अवस्थेत असून या काळात पाणी देणे अतिशय महत्वाची गरज असते. त्यामुळे या वाढीच्या अवस्थेत पाण्याच्या किती पाळ्या द्याव्या लागतात, हे समजून घेतले पाहिजे.
भुईमुगाचे पाणी व्यवस्थापन
- उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सें.मी. पाणी लागते.
- उगवण चांगली होण्यासाठी पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी हलके पाणी द्यावे.
- त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या दहा ते बारा पाळ्या द्याव्यात.
- पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा काहीसा ताण द्यावा.
- आऱ्या जमिनीत घुसण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.
- लागवडीसाठी प्लॅस्टिक आच्छादन तंत्राचा अवलंब केल्यास पाण्याची ४० ते ५० टक्के बचत होते.
- भुईमुगासाठी तुषार सिंचन पद्धत उपयुक्त ठरते. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होते.
- तसेच पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन पीकवाढीस उपयुक्त ठरते.
बाजरीसाठी पाणी व्यवस्थापन
- पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी हलके (आंबवणीचे) पाणी द्यावे.
- त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार व पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास, पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी),
- दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी), तिसरे पाणी दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी सेवा केंद्र, इगतपुरी
