येवला : शेती करून कमीतकमी पाण्यात व अत्यंत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणे याकडे तरुण शेतकऱ्यांचा कल असतो. येवला तालुक्यातील विखरणी येथील तरुण शेतकरी संदीप आण्णासाहेब शेलार याने अवघ्या १ एकर क्षेत्रात ११०० पेरूची झाडे लावून त्याने कमी पाण्यात शेती करण्याचा आदर्श निर्माण केला आहे.
आर्थिक अडचणीमुळे ठिबक सिंचन बसवणे शक्य नसताना संदीपने ठिबक सिंचन ऐवजी एक उपाय शोधला. १ लिटर पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या उलट्या लावून त्या बाटल्यांना सलाईन पाइपचा वापर करून प्रत्येक झाडाला पाणी देण्याची व्यवस्था केली. प्रयोगामुळे पाणी झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचते. पाण्याचा अपव्यय टळतो.
जेव्हा पाणी कमी असते आणि पारंपारिक ठिबक सिंचन यंत्रणा बसवणे शक्य नसते, तेव्हा काहीतरी वेगळे करण्याची गरज असते. या कल्पक शेतकऱ्याने टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या आणि सलाईन पाइप्सचा वापर करून एका अभूतपूर्व सिंचन पद्धतीचा शोध लावला. हा प्रयोग म्हणजे फक्त पाण्याची बचत करणारी 'जुगाड' नाही, तर कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमता कशी मिळवता येते, याचे एक उत्तम उदाहरण आहे.
कांदा पीक परवडत नसल्याने नवीन काहीतरी करून बघावे या उद्देशाने पेरूची लागवड केली. मात्र ऐन उन्हाळ्यात पाणी कमी पडल्याने व आर्थिक क्षमता नसल्याने १ लिटर क्षमतेच्या पाण्याच्या बाटल्या व वापरली गेलेली सलाईन पाइपचा वापर केला. यातून ठिबक सिंचन करून पेरुची झाडे जगवण्याचा प्रयत्न केला. त्यात यशही आले.
- संदीप शेलार, शेतकरी, विखरणी
Tur Bajarbhav : यंदाच्या एप्रिल महिन्यात तुरीचे दर कसे राहतील, MSP च्या पुढे जातील का? वाचा सविस्तर
