Agriculture News : द्राक्ष वेलीवरील परिणाम अतिथंडीमुळे मुळांची वाढ मर्यादित होते, त्यामुळे पाने लहान व पातळ राहतात. शेड्यांची वाढ थांबते आणि कॅनोपी कमकुवत होते. पोटॅश, कॅल्शिअम व फॉस्फरस यांचे शोषण कमी होते, परिणामी मण्यांवर विकृती दिसून येतात. थंडी जास्त असल्यास रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
रोग नियंत्रण
- कमी तापमानामध्ये प्रामुख्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. दाट कॅनॉपी असलेल्या वेलीवर भुरीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसेल.
- बऱ्याच ठिकाणी पानाच्या मागे दडलेला द्राक्षघड पूर्णपणे भुरी रोगाने ग्रस्त झालेला दिसून येईल.
- या वेळी द्राक्षबागेत ५० दिवसांनंतर वाढीच्या अवस्थेत आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करण्याची शिफारस नाही.
- यावर उपाययोजना म्हणून स्पर्शजन्य बुरशीनाशकांची धुरळणी करता येईल.
- मोकळी कॅनॉपी असलेल्या बागेत ही समस्या कमी प्रमाणात दिसून येते.
- कारण या कॅनॉपीमध्ये हवा सतत खेळती राहिल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण कमी राहते.
- त्यामुळे फवारणीचे कव्हरेज चांगले होऊन प्रभावी रोग नियंत्रण होते.
- म्हणजेच या कॅनॉपीमध्ये रोगास पोषक वातावरण तयार होत नाही. या वेळी जैविक नियंत्रणावर जोर देता येईल.
- धुके, पानांवर दवबिंदू जास्त काळ टिकून राहिल्यास पाने जास्त काळ ओली राहतात.
- त्यामुळे आर्द्रतासुद्धा वाढते. या काळात डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगाचे बीजाणू सक्रिय होतात.
- पाणी उतरत असलेल्या परिस्थितीत सुद्धा याचा प्रादुर्भाव दिसून येईल.
- अशा वातावरणात भुरी आणि डाऊनी या दोन्ही रोगांचे नियंत्रण गरजेचे असेल.
- ज्या बागेत पाने जास्त वेळ ओली राहतात, तेथे स्पर्शजन्य बुरशीनाशकांची धुरळणी करणे फायद्याचे असेल.
- यामुळे ओल्या पानांवर जास्त वेळ बुरशीनाशक चिकटून राहील व रोग नियंत्रण सोपे होईल.
- कॅनॉपीत वाढलेल्या आर्द्रतेत पाने जास्त काळ ओली नसलेल्या परिस्थितीत जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माच्या तीन-चार फवारण्या करून घेतल्यास प्रभावी रोग नियंत्रण होईल.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
