Chia Crop Management : औषधी गुणधर्मामुळे बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या चिया पिकामध्ये मोहरीची भेसळ शेतकऱ्यांसाठी भविष्यात मोठे आर्थिक नुकसान ठरू शकते. त्यामुळे सध्या फुलोरा अवस्थेत असलेली मोहरीची झाडे तात्काळ नष्ट करून चिया पिकाचे संरक्षण करावे, असा स्पष्ट इशारा वाशिम जिल्हा कृषी विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात चिया या प्रीमियम पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वेगाने वाढत आहे. गतवर्षी जिल्ह्यात सुमारे ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर चियाची लागवड होती.
मात्र, यंदा हे क्षेत्र ६ हजार हेक्टरपेक्षा अधिक झाले असून, मोठ्या प्रमाणावर शेतकरी चिया पिकाची लागवड करत आहेत. अशा परिस्थितीत उत्पादनाचा दर्जा टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.
बिया सारख्या असल्याने धोका अधिक
चिया आणि मोहरी या दोन्ही पिकांच्या बिया आकार व रंगाने काही प्रमाणात सारख्या असल्याने मळणीच्या वेळी मोहरीच्या बिया चियामध्ये मिसळण्याचा धोका अधिक असतो.
एकदा का बिया मिसळल्या, तर नंतर त्या वेगळ्या करणे खर्चिक आणि कष्टाचे ठरते. परिणामी चियाचा दर्जा घसरतो आणि बाजारात अपेक्षित दर मिळत नाही.
फुलोरा अवस्थेत ओळख सोपी
सध्या चिया आणि मोहरी ही दोन्ही पिके फुलोरा अवस्थेत असल्याने मोहरी ओळखणे सोपे आहे.
चिया पिकाला निळसर-जांभळ्या रंगाची फुले येतात
तर मोहरीला ठळक पिवळ्या रंगाची फुले लागलेली दिसतात
याशिवाय मोहरीची झाडे अनेकदा आकाराने मोठी व चियापेक्षा उंच वाढलेली आढळतात. त्यामुळे याच टप्प्यावर मोहरीची झाडे मुळासकट उपटून टाकणे सर्वाधिक फायदेशीर ठरते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
विलगीकरण का आवश्यक?
मोहरीची झाडे वेळेत नष्ट केली नाहीत, तर त्यांना शेंगा येऊन बिया तयार होतात. मळणीच्या वेळी या बिया चियामध्ये मिसळल्यास चियाची गुणवत्ता घसरते.
दर्जेदार चियाला बाजारात प्रीमियम दर मिळतो, मात्र भेसळ झाल्यास दरात मोठी घट होते. त्यामुळे विलगीकरण न केल्यास शेतकऱ्यांना थेट आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
शेतकऱ्यांनी काय करावे?
* चिया शेताची तातडीने पाहणी करावी
* पिवळी फुले असलेली मोहरीची झाडे ओळखून मुळासकट उपटून टाकावीत
* बिया तयार होण्यापूर्वीच विलगीकरण करावे
* यामुळे मळणीनंतरचा शुद्धीकरण खर्च टळतो आणि उत्पादनाचा दर्जा टिकतो
कृषी विभागाने काय दिला इशारा
चिया हे प्रीमियम पीक असून त्याचा बाजारभाव पूर्णतः दर्जावर अवलंबून असतो. सध्या मोहरी फुलोरा अवस्थेत असल्याने विलगीकरणासाठी हीच योग्य वेळ आहे. शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता मोहरीची झाडे काढून टाकावीत. - अनिसा महाबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम
चिया पिकातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी वेळीच मोहरीचे विलगीकरण करणे अत्यावश्यक असून, शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
