Unhal Pik Utpadan : उन्हाळी पीक उत्पादनात (Summer Crop Management) पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो. पिकास पाणी देण्याच्या पद्धतीत ठराविक दिवसाच्या अंतराने पिकास पाणी देणे, बाष्पीभवन पात्रातून पाण्याचे होणारे विशिष्ट प्रमाणातील बाष्पीभवन लक्षात घेऊन पिकास पाणी देणे (Unhali Pike Pani) आणि पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेत पिकास पाणी देणे याचा समावेश होतो.
- उन्हाळी पिकांसाठी संवेदनक्षम अवस्था नुसार पाणी दिल्यास दोन पाण्यातील अंतर जास्त राहते.
- उन्हाळी हंगामात वातावरणाची पाण्याची गरज खूपच जास्त असल्याने जास्त अंतराने दिलेल्या पाण्याने पिकाची गरज भागत नाही.
- पर्यायाने पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
- म्हणून उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकांना जमिनीच्या प्रकारानुसार ठराविक दिवसाच्या अंतराने पाणी देणे गरजेचे असते.
- एकंदरीत उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकांना जमिनीच्या मगदूराप्रमाणे ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
असे करा पाणी व्यवस्थापन
- उन्हाळी भुईमुगाची पाण्याची एकूण गरज सुमारे ७०० ते ८०० मि.मी. (७० ते ८० से.मी.) एवढी असते. ही गरज एकूण १२ ते १३ पाण्याच्या पाळयातून भागवावी.
- मका पिकाची पाण्याची गरज ४० ते ४२ सें.मी. एवढी असते. उन्हाळी हंगामात ६ ते ७ पाण्याच्या पाळया मका पिकास द्याव्यात.
- बाजरी पिकास उन्हाळी हंगामात ३० ते ३५ सें.मी. पाणी लागते. त्यासाठी बाजरी पिकास ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- सूर्यफूल पिकाची उन्हाळी हंगामातील पाण्याची गरज जवळपास ४० सें.मी. एवढे असते. सूर्यफूल पिकालाही उन्हाळी हंगामात ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- कांदा, वांगी, दोडका यासारख्या भाजीपाला पिकास ७५ ते ८० सें.मी. पाणी उन्हाळी हंगामात लागते. या पिकांना एकूण १३ ते १५ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ