सद्यस्थितीत आंबा काढणी सुरु आहे. ढगाळ वातावरण वाढलेल्या आर्द्रतेमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव, फळकुज तसेच तापमान वाढीमुळे साक्याचे प्रमाण वाढू शकते अशा वेळी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
- ज्या ठिकाणी आंबाफळे काढणीस तयार झालेली असतील अशा ठिकाणी आंब्याची काढणी झेल्याच्या सहाय्याने देठासह चौदा आणे (८५ ते ९० टक्के) पक्वतेला करुन घ्यावी.
- करपामागील आठवड्यात ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंबा फळावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास शक्यता आहे. प्रादुर्भाव झाल्यास बुरशीनाशकाची फवारणी करावी. बुरशीनाशकाची फवारणी न केल्याने फळावरील काळे डाग वाढत जाऊन फळ सडण्याची प्रक्रिया होऊ शकते. त्यासाठी जी फळे १५ दिवसानंतर काढायची आहेत त्यावर करपा रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी कार्बेन्डेझिम १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर १५ दिवसांनी त्या फळांची काढणी करावी.
- फळकुजदमट वातावरणामुळे काढणी केलेल्या आंबा फळावर फळकुज या रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते, यामुळे फळे काढल्यानंतर फळांवर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसुन फळे कुजतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होते. फळकूज नियंत्रणासाठी फळे काढणीनंतर लगेचच ५० अंश सेल्सिअस च्या पाण्यात १० मिनीटे बुडवुन काढावीत (उष्ण जलप्रक्रिया). अशी फळे खोक्यात भरावीत अथवा पिकण्यासाठी आडीत ठेवावीत.
- साक्याचे प्रमाणआंबा फळांची काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आंब्याची फळे काढल्यानंतर लगेचच सावलीमध्ये ठेवावीत. आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. आंबा वाहतुक भरदिवसा उन्हामध्ये वाहनांच्या टपावरुन करु नये.
- फळगळकोरडे हवामान, तापमानात होणारी वाढ आणि बाष्पीभवनात झालेली वाढ यामुळे झाडाला ताण बसून फळगळ होण्याची शक्यता असते. वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांच्या अवस्थेत असलेल्या आंबा फळांची फळगळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ लिटर पाणी प्रति झाड प्रतिदिन किंवा १५ दिवसातून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे वाटाणा आकारापासून ते सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे तसेच झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे.
- फळमाशीआंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसुन येण्याच्या शक्यता आहे. अश्या वेळी बागेमध्ये गळलेली फळे गोळा करुन नष्ट करावीत आणि आंबा फळांचे फळमाशीपासुन संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी २ याप्रमाणात बागेमध्ये झाडाच्या खालील बाजुच्या फाद्यांवर लावावेत
- डाग विरहीत फळांसाठीआंबा फळांचे फळमाशी पासून तसेच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहीत फळांसाठी, गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉ.बा.सा.को.कृ.विद्यापीठाने दिलेल्या शिफारशी नुसार २५ X २० सें.मी. आकाराच्या कागदी/वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे अवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
अधिक वाचा: हळदीचे बेणे अधिक काळ टिकण्यासाठी साठवणूकीत करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर