Join us

कोकण विद्यापीठाच्या १३५ दिवसांत तयार होणाऱ्या ह्या भात वाणाला शेतकऱ्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 11:31 AM

'रत्नागिरी आठ' (सुवर्णा-मसुरा) वाणाला असलेल्या वाढत्या मागणीमुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने गतवर्षीच्या ६० टन बियाणापेक्षा दुप्पट बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

मेहरून नाकाडेरत्नागिरी: चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या 'रत्नागिरी आठ' (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह अन्य सहा राज्यांनाही लागली आहे. या वाणाला असलेल्या वाढत्या मागणीमुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने गतवर्षीच्या ६० टन बियाणापेक्षा दुप्पट बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी १५० टन बियाणे विद्यापीठाने वितरणासाठी तयार केले आहे.

शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राने २०१९ साली 'रत्नागिरी आठ' हे वाण विकसित केले. देशातील काही खासगी कंपन्या विद्यापीठाच्या मान्यतेने बियाणे तयार करून विक्री करत आहेत.

कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये या वाणाने लोकप्रियता मिळवली आहे, तसेच गेल्या चार वर्षांत या वाणाला उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांतूनही पसंती मिळाली आहे.

'सुवर्णा' या जातीला पर्याय म्हणून 'रत्नागिरी-आठ' हे वाण विकसित केले आहे. १३५ ते १४० दिवसांत हे भातपीक तयार होते. कापणी वेळेवर केल्यास तांदूळ तुटीचे प्रमाण कमी येते. मध्यम उंची असल्यामुळे भात जमिनीवर लोळत नाही, तसेच कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.

बदलत्या हवामानात टिकणारे 'रत्नागिरी-आठ' हे वाण असून, उशिरा पडणाऱ्या पावसाचा फटकाही बसत नाही. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या बियाणांची लागवड करण्यात येते. गतवर्षी शिरगाव कृषी संशोधन केंद्र, वेंगुर्ला केंद्रावरून ६० टन भात उपलब्ध करून दिले होते.

उत्पादकता चांगली'रत्नागिरी-आठ' या वाणाच्या एक हजार दाण्यांचे वजन १६ ते १७ ग्रॅम आहे. या जातीचे विद्यापीठस्तरावरील उत्पन्न प्रतिहेक्टर ५५ ते ६० क्चिंटल आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रतिहेक्टर ८५ ते ९० क्विंटल उत्पन्न घेतले आहे.  यावर्षी वाढत्या मागणीमुळे कोकण कृषी विद्यापीठातर्फे १५० टन बियाणे तयार

रत्नागिरी-आठ या वाणाची वैशिष्ट्ये■ २०१९ साली 'रत्नागिरी आठ' हे वाण विकसित.■ पिकाचा कालावधी १३५ ते १३८ दिवस.■ दाण्याचा प्रकार मध्यम बारीक.■ पिकाची उंची - १०० ते ११० सें. मी.■ सरासरी उत्पादन ५५ ते ६० क्विंटल.■ करपा, कडाकरपा रोगास प्रतिकारक.■ राष्ट्रीय पातळीवर सहा राज्यांसाठी शिफारशीत वाण.

शिरगाव भात संशोधन केंद्राने आतापर्यंत भाताच्या ११ जाती व एक संकरित जात विकसित केल्या आहेत. 'रत्नागिरी आठ'ची शिरगाव संशोधन केंद्रात २३ टन, वेंगुर्ला संशोधन केंद्रात १०० टन, तर दापोली येथील विद्यापीठात २७ टन मिळून एकूण १५० टन बियाणांची उपलब्धता करण्यात आली आहे. - डॉ. विजय दळवी, प्रभारी संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव, रत्नागिरी

टॅग्स :भातशेतकरीशेतीकोकणदापोलीरत्नागिरीमहाराष्ट्र