पुणे : मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० तसेच मागेल त्याला सौर कृषीपंप या योजनांमध्ये राज्यातील ३२ लाख ७६ हजार म्हणजेच एकूण कृषिपंपांपैकी ७३ टक्के कृषीपंपांना सध्या दिवसा वीजपुरवठा होत आहे.
असा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट या दोन योजनांमधून ठेवले आहे.
शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
या योजनेमुळे ६५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ७० हजारांवर ग्रामीण रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच महावितरणच्या वीज खरेदीमध्ये दहा हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे.
तब्बल २३१ विकासकांकडून या योजनेमध्ये १६ हजार मेगावॉटचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प वेगाने उभारण्यात येत आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० मध्ये १६ हजार मेगावॉट विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होणार असून, आतापर्यंत ३ हजार १८७ कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण केले आहे.
राज्यातील तब्बल १२ लाख ८२ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा ४ हजार ७७९ मेगावॉट विजेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे.
तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनेसह विविध योजनांमधून राज्यात ९ लाख १७ हजार ५८७ कृषीपंप कार्यान्वित केले आहेत.
देशभरात बसवण्यात आलेल्या एकूण ऑफ ग्रीड सौर कृषिपंपांपैकी ६४ टक्के कृषीपंप एकट्या महाराष्ट्रात बसविले आहे.
३२ लाख ७६ हजार म्हणजेच एकूण कृषिपंपांपैकी ७३ टक्के कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अधिक वाचा: वडिलोपार्जित शेतजमीन वाटणीचा खर्च आता वाचणार; वाचा महसूल विभागाचा 'हा' नवीन निर्णय?
