Mango Buying Tips: यंदा अक्षय तृतीयेला आंबा खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मात्र, बाजारात आलेल्या बहुतेक आंब्यांची चव आंबट आणि कडू लागत असल्याने नागरिक नाराज झाले. व्यापाऱ्यांनी जास्त नफ्यासाठी कॅल्शिअम कार्बाइडसारख्या घातक रसायनाचा वापर करून आंबे पिकवल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
अक्षय तृतीया हा वैशाख महिन्यातील सण आहे. साधारणपणे हा मे महिन्यात येतो, जेव्हा आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होतो. मात्र, यंदा १९ एप्रिलला हा सण आला होता. यामुळे अद्याप पूर्णपणे पिकलेले आंबे बाजारात उपलब्ध नव्हते. व्यापाऱ्यांनी कच्च्या आंब्यांवर रसायन लावून ते त्वरित विक्रीसाठी तयार केले. परिणामी, आंबे बाहेरून पिवळे दिसत असले तरी आतून आंबट आणि अपरिपक्व राहिले.
आंबा झाडावर पूर्ण विकसित होऊन कच्चा तोडला जातो. अढी पद्धतीने भाताच्या पेंढ्या किंवा गवताच्या थरात आंबे ठेवून ८ ते १० दिवसांत नैसर्गिक पिकवतात. नियंत्रित इथेलिन गॅस वापरून सुरक्षितरीत्या पिकवला जातो. देवगड-रत्नागिरी हापूसचा एप्रिल ते जून, गुजरातमधील केसर मे-जून, कर्नाटक-आंध्रप्रदेशमधील बदामी, लालबागचा मार्च ते मे, तर उत्तर भारतातून येणाऱ्या दशहरी, लंगडा जातींच्या आंब्यांचा मे ते जुलै असा हंगाम असतो.
नैसर्गिक आंबा कसा ओळखावा?
◼️ नैसर्गिक आंब्याला गोड सुगंध येतो.
◼️ नैसर्गिक आंबा असमान रंगाचा असून त्याला कुठे-कुठे हिरवा डाग असतो.
◼️ नैसर्गिक आंबा एकसमान, तेजस्वी व पिवळा असतो.
◼️ तो हलक्या दाबाने सर्वत्र मऊ, तर रसायनयुक्त आंबा बाहेर मऊ, तर आत कठीण असतो.
◼️ नैसर्गिक आंबा कापल्यावर तो एकसमान असून त्यात पिवळा-नारंगी रसाळ गोडवा असतो.
◼️ नैसर्गिक आंब्यात चीक आणि गोडवा असतो.
◼️ रासायनिक आंब्यात कडवटपणा असतो.
रसायनांचा वापर करून पिकवलेला आंबा
◼️ रसायनांनी आंबा पिकविताना व्यापारी कॅल्शिअम कार्बाइड वापरतात.
◼️ रसायनयुक्त क्रियेने पिकविलेल्या आंब्याला वास नसतो.
◼️ कच्चे आंबे बंद खोलीत किंवा बॉक्समध्ये ठेवतात.
◼️ त्यात कार्बाइडचे तुकडे किंवा पावडर टाकतात.
◼️ त्यामुळे आंबा २४ ते ४८ तासांत बाहेरून पिवळा होतो.
◼️ रासायनिक आंबा आत आंबट किंवा तुरट असतो.
◼️ यावर थोडा राखेसारखा पावडरचा थर असल्यासारखे दिसते.
◼️ मात्र असे आंबे आरोग्यास हानिकारक ठरतात.
अधिक वाचा: इतर झाडाच्या तुलनेत नारळाच्या झाडावरच का पडते वीज? जाणून घ्या ह्या मागचे लॉजिक
