Kanda Market : गेले काही दिवस कांद्याला समाधानकारक दर मिळत होते. मात्र हे समाधान केवळ काही दिवसच टिकले. कारण बांग्लादेशमध्ये उसळलेल्या आंदोलनानंतर कांदा बाजारावर चांगलाच परिणाम झाला. शिवाय पाकिस्तानचा कांदाही बाजारात आल्याने दर घसरल्याचे निर्यातदारांकडून समजते आहे. दर घसरण्याची नेमकी कारणे काय आहेत, हे कमी झालेले दर कधीपर्यंत सुधारतील, हे पाहुयात...
कांदा दरात चढ उतार सुरूच आहे. एकीकडे बांग्लादेशमध्ये निर्यात सुरु झाल्यानंतर भावात सुधारणा होत होती. मात्र बांग्लादेशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आणि कांद्यावर पुन्हा संक्रात आली. दुसरे महत्वाचे कारण असे की पाकीस्तानच्या सिंध प्रांतातील कांदा देखील बाजारात आलेला आहे. हा कांदा भारतीय कांद्यासारख्याच दिसत आहे, मात्र भाव कमी आहे. त्यामुळे जिथं हा कांदा जातोय, तिथल्या व्यापारी, ग्राहकांमध्ये याला पसंती आहे.
एकीकडे भारतीय कांद्याची निर्यात आता दुबईसह आखाती देशांमध्येही होऊ लागली आहे. मात्र पाकिस्तानच्या कांद्यामुळे बाजारावर परिणाम होऊ लागला आहे. मात्र एक महत्वाची गोष्ट अशी की आपल्या कांद्याला जगातील स्तरावर चांगला दर मिळत आहे. परिणामी पाकिस्तानच्या कांद्याला यापेक्षा अतिशय कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे हा पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कांदा केवळ काही दिवसांपुरता बाजारात दिसणार आहे. कारण आपल्या केवळ नाशिक जिल्ह्याच्या उत्पादनाएवढे त्याचे उत्पादन असणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत भारतीय कांदा बाजारात परिस्थिती सुरळीत होईल, अशी आशा आहे.
