राज्यासह परराज्यातून हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोली जिल्ह्याच्या वसमत बाजार समिती मोंढ्यात सध्या आर्थिक चक्र बिघडल्याचे पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांमधील अंतर्गत देण्या-घेण्याच्या रक्कमेवरून निर्माण झालेल्या वादामुळे गेल्या आठवडाभरापासून हळदीचे सौदे (बिट) बंद आहेत.
याचा थेट फटका दूरवरून हळद घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना बसत असून त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वसमत मोंढ्यात २७ जानेवारी रोजी हळदीचे शेवटचे बिट झाले होते. मात्र व्यापाऱ्यांची मोठी रक्कम एकमेकांकडे थकल्याने बाजारपेठेत आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे.
परिणामी, व्यापाऱ्यांनी खरेदी थांबवली असून आठवडाभरापासून लिलाव प्रक्रिया बंद आहे. मोंढ्यात परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांसह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातूनही शेतकरी हळद विक्रीसाठी येतात. मात्र लिलाव बंद असल्याने या शेतकऱ्यांचा माल पडून आहे.
१०० कट्टे हळद बिटासाठी आणली आहे. पण आठवडाभरापासून मोंढ्यातील व्यवहार ठप्प असल्याने गेल्या तीन दिवसांपासून हेलपाटे मारावे लागत आहेत. आर्थिक चणचण तर आहेच, शिवाय येथे थांबण्याचा खर्चही वाढत आहे. बाजार समिती प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालून आमची परवड थांबवावी. - प्रशांत कापसे, शेतकरी (पूर्णा).
मोंढ्यात काही तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे गेल्या तीन दिवसांपासून बिट होऊ शकले नाही. मात्र लवकरच हे व्यवहार सुरळीत होतील. बाजार समिती प्रशासन शेतकऱ्यांच्या हिताची पूर्ण काळजी घेत असून लवकरच लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल. - सोपान शिंदे, सचिव, बाजार समिती वसमत.
हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर
