जवळपास तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोयाबीनचे भाव वधारल्याचे येथील मोंढ्यात शनिवारी पहायला मिळाले. काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनने पाच हजाराचा पल्ला गाठला. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या भावातही वाढ झाल्याने काही प्रमाणात का होईना उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात यंदा हंगामात सोयाबीनला पडता भाव राहिला. त्यामुळे बहुतांश उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. अनेक शेतकऱ्यांनी तर हिंगोलीच्या मोंढ्याऐवजी वाशिमची बाजारपेठ जवळ केली. त्या ठिकाणी काही प्रमाणात का होईना समाधानकारक भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शिवाय यंदा हमीभाव केंद्रही उशिराने सुरू झाल्याने दिवाळीत आर्थिक निकडमुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करावे लागले. जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केले आहे. त्यामुळे आवकही मंदावली आहे. अशा परिस्थतीत आता सोयाबीनचे भाव वधारत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
शनिवारी काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ५ हजार रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तर हळदीच्या भावातही आठवडाभरापासून वाढ होताना पहायला मिळत आहे. गत महिन्यात सरासरी १३ ते १३ हजार ५०० रुपये क्विंटलने विक्री होणाऱ्या हळदीला चालू आठवड्यात सरासरी १५ हजार रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सोयाबीन, हळदीची आवक घटली
• हिंगोली येथील मोंढ्यात सोयाबीन व हळदीची आवक घटली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये दीड ते दोन हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत होते.
• आता मात्र सरासरी एक हजार किंवा त्याहूनही कमी सोयाबीनची आवक होत आहे. तर हळदीच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे.
• मोजक्याच शेतकऱ्यांकडे हळद शिल्लक आहे. त्यामुळे आवक एक हजार क्विंटलपेक्षाही कमी होत आहे.
शेतकऱ्यांना तुरीचे भाव वधारण्याची आशा
आठवडाभरात शेतकन्यांकडे नवी तूर उपलब्ध होणार आहे. सध्या मॉड्यात मिळत असलेला सरासरी ६ हजार रुपयांचा भाव कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवीन तुरीला किमान ७ ते ८ हजारांचा भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे.
