कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला येथे सध्या सोयाबीनच्या दरात मोठी वाढ नोंदवली जात असून प्रतिक्विंटल दर तब्बल ७ हजार ३९५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे बाजारात सोयाबीन पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र, या वाढीव दराचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात सोयाबीनला अपेक्षित दर मिळाले नव्हते. बाजार समित्यांमध्ये अनेक ठिकाणी प्रतिक्विंटल दर ५ हजार रुपयांच्या खाली घसरले होते. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. बियाणे, खत, औषधे, मजुरी, सिंचन आणि इतर खर्च भागवताना अनेक शेतकरी आधीच कर्जबाजारी झाले होते.
त्यातच घरगुती गरजा, शिक्षण खर्च आणि बँकांच्या कर्जफेडीचा ताण वाढल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कमी दरातच सोयाबीन विक्रीस काढले. आता बाजारात दर ७ हजार ३९५ रुपयांपर्यंत पोहोचल्याने सुरुवातीच्या दरांच्या तुलनेत प्रतिक्विंटल सुमारे २ हजार ३९५ रुपयांचा फरक निर्माण झाला आहे.
छोट्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आधीच विकले
सध्या वाढलेल्या दराचा फायदा फक्त त्या शेतकऱ्यांना होत आहे ज्यांच्याकडे अजूनही सोयाबीनचा साठा शिल्लक आहे. मात्र, बहुतांश लहान आणि मध्यम शेतकऱ्यांकडे साठवणुकीची सुविधा नसल्याने त्यांना तातडीने विक्री करावी लागली होती. गोदामांची कमतरता, आर्थिक अडचणी आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी दरवाढीची प्रतीक्षा करू शकले नाहीत.
परिणामी, सध्याच्या वाढलेल्या दराचा लाभव्यापारी आणि मोठे साठेबाज यांना अधिक होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, खाद्यतेलाची मागणी, उत्पादनातील घट आणि साठेबाजी यांसारख्या कारणांमुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाली असण्याची शक्यता आहे.
