रोजच्या स्वयंपाकातील आणि हॉटेलमधील पदार्थांना झणझणीत ठसक्याची चव देणारी लाल मिरची यंदा बाजारात देखील भाव खात आहे. परतीच्या पावसाचा फटका आणि हवामानातील बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.
परिणामी, बाजारात आवक कमी झाली असून, दर झपाट्याने वाढले आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख उत्पादक राज्यांत अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.
आंध्र प्रदेशातील गुंटूर व खमाम, तेलंगणातील वारंगल, तसेच कर्नाटकातील खंडगी व हुबळी येथे देशातील प्रमुख मिरची बाजार भरतात. येथून देशांतर्गत, तसेच अमेरिका, चीन आदी देशांत निर्यात केली जाते.
दररोज सुमारे ६ ते ७ लाख गोण्या मिरचीची उलाढाल होत असते. मात्र, यंदा ही आवक मात्र जवळपास निम्म्यावर आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी दर तेजीत आहे.
किरकोळ बाजारातील मिरचीचे 'भाव' काय?
| प्रकार | २०२५ | २०२६ (प्र. क्विं.) |
| बेडगी | ३८० ते ४०० | ५०० ते ५५० |
| चपाटा | २०० ते २५० | ४५० ते ५०० |
| रसगुल्ला | ३०० ते ३५० | ५०० ते ५५० |
| सी ५ | १५० ते २०० | ३०० ते ३५० |
