भंडारा : खरिपातील धान खरेदीचे वाढीव लक्षांक न मिळाल्याने खरेदी प्रलंबित ठरली आहे. जिल्ह्यात खरिपातील क्विंटल धान मोजणीच्या प्रतीक्षेत असताना केंद्र सरकारने राज्यसरकारच्या माध्यमातून रब्बी धान खरेदीचे आदेश दिले आहेत. १ ते ३० एप्रिल पर्यंत ऑनलाइन नोंदणी तर १ मे ते ३० जूनपर्यंत धान, भरडधान्य खरेदीचे आदेश जिल्हा पणन कार्यालयाला धडकले आहेत.
जिल्ह्यात खरीप हंगामात ३१.५२ लाख क्विंटल धान खरेदी आटोपली असून अंदाजे ४० टक्के खरेदी शिल्लक आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला स्थानिक आमदारांनी सभागृहात सुद्धा वाढीव लक्षाकांकरिता पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनपर्यंत तरी वाढीव लक्षांक जिल्ह्याला मिळालेला नाही.
ऑनलाईन नोंदणीची मर्यादा
रब्बी (उन्हाळी) २०२५-२६ हंगामा करिता नोंदणीची मर्यादा १ ते ३० एप्रिलपर्यंत दिली आहे. महिनाभराच्या कालावधीत शेतकऱ्यांना बीम पोर्टलवर नोंद करणे आहे. १ मेपासून ३० जूनपर्यंत नोंदणीकृत शेतकऱ्यांना जवळच्या नोंदणीकृत धान खरेदी केंद्रावर धान मोजणी करता येणार आहे.
बोनस मिळणार का?
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात शासनाकडून बोनस जाहीर करण्यात आला आहे. मात्र शासनाने तत्वतः बोनस देण्याचे मंजूर केले असले तरी, हेक्टरी किती रुपयाचे बोनस देणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवले आहे. १ डिसेंबरपासून सुरू झालेल्या धान खरेदीचे धान अजूनही खरेदी केंद्रात पडून आहेत. रब्बीतील धान खरेदी सुरू करण्यापूर्वी खरिपाच्या धानाची उचल होणे अत्यावश्यक आहे.
केंद्र व राज्य सरकारने खरिपातील शेतकऱ्यांना वाढीव लक्षांक देऊन न्याय द्यावा. धान उत्पादक शेतकरी अनेक संकटातून प्रवास करीत आहे. जिल्ह्यात प्रतीक्षेत असलेली २० लाख क्विंटलची परवानगी द्यावी. जेणे करुन त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
- विनायक बुरडे, अध्यक्ष सेवा सहकारी संस्था जेवणाळा.
रब्बी खरेदीचे आदेश मिळाले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार अंमलबजावणी केली जाईल. तशी कारवाई केली जाणार आहे. खरिपातील वाढीव लक्षांकाचा पाठपुरावा शासकीय स्तरावर सुरू आहे.
- सुधीर पाटील, पणन अधिकारी भंडारा
