रब्बी हंगामातील पीक बाजारात येत असताना शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्याची गरज आहे. सध्या गावागावांत जादा दराचे आमिष दाखवून 'कोऱ्या' पावतीवर खरेदी करणाऱ्या अवैध व्यापाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन सभापती राजेंद्र पाटील यांनी केले आहे.
बाजार समितीचा परवाना न घेता, गावागावांत जाऊन शेतमालाला जादा भाव देण्याचे आमिष दाखविणाऱ्या अवैध व्यापाऱ्यांचे जाळे वाढत आहे. काही व्यापारी समितीच्या आवाराबाहेर जाऊन अप्रमाणित 'कोऱ्या' पावती पुस्तकाद्वारे शेतमालाची खरेदी करत आहेत.
यामध्ये इलेक्ट्रॉनिक व अप्रमाणित वजनकाट्यांचा वापर करून शेतकऱ्यांच्या वजनात माप मारले जाण्याची दाट शक्यता आहे. बाजार समिती कायदा १९६३ व नियम १९६७ नुसार, विनापरवाना खरेदी-विक्री करणे गुन्हा आहे. असे करताना आढळल्यास संबंधित व्यापाऱ्याकडून बाजार फीच्या तीनपट दंड वसूल केला जाईल.
तसेच शेतमाल विक्री केल्यानंतर अडत किंवा व्यापाऱ्याकडून फक्त 'लाल रंगाचे' बाजार समितीचे अधिकृत प्रमाणित बिल घ्यावे. पांढऱ्या किंवा कोऱ्या पावतीवर व्यवहार करू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी सुरक्षित व्यवहारासाठी बाजार समितीच्या अधिकृत यंत्रणेचाच वापर करावा. व्यापाऱ्यांकडून लाल रंगाचे प्रमाणित बिल घ्यावे. काही संशयास्पद प्रकार घडल्यास तत्काळ बाजार समितीशी संपर्क साधावा. - पी.सी. माकोडे, सचिव बाजार समिती धाराशिव.
हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर
