अमरावती : हंगाम लागल्याने गहू, तूर व हरभऱ्याची मोठी आवक बाजार समित्यांमध्ये होत आहे. त्यामुळे आवक वाढताच शेतमालाचे दरात घसरण झालेली आहे. हमीदरापेक्षा कमी दर मार्केटमध्ये आहे. त्यामुळे नाफेडची खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
महिनाभरापूर्वी सर्व शेतमालाचे दर हमीभावापेक्षा जास्त होते. मात्र त्यानंतर तूर व हरभऱ्याचा हंगामा लागला व आता गव्हाची काढणी सुरू झालेली आहे. अशा परिस्थितीत आर्थिक अडचणीतील शेतकरी शेतमाल बाजार समित्यांमध्ये आणत असल्याने आवक वाढली आहे.
मात्र आर्द्रतेचे कारण सांगत व्यापाऱ्यांद्वारे दर पाडण्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यावर्षी देशांतर्गत उत्पन्नात कमी आलेली आहे. अशा परिस्थितीत सणासुदीत मागणी वाढल्याने फेब्रुवारीत तुरीचे दर ९ हजारांवर पोहोचले होते.
यंदा आफ्रिकन देशातून येणाऱ्या 'लेमन' तुरीची आवक कमी असताना देखील दरात घसरण झाली आहे विशेष.
बाजारभाव अन् हमीभाव (रु/क्विं)
| वाण | यंदाचा हमीभाव | बाजारभाव |
| तूर | ८००० | ७४०० ते ८००० |
| हरभरा | ५८७५ | ४७५० ते ५१०० |
| गहू | २५८५ | १८५० ते २६५० |
गव्हाचे यंदा उच्चांकी क्षेत्र
यावर्षी हरभऱ्याचे क्षेत्र सरासरी एक लाख हेक्टर क्षेत्रावर स्थिरावले असले तरी गव्हाचे मात्र ६० हजार हेक्टर उच्चांकी क्षेत्र आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यात चारवेळा वातावरणात बदल झाला व ढगाळ वातावरण होते.
मात्र वादळासह अवकाळी पाऊस व गारपीट नसल्याने यावर्षी गहू व हरभऱ्याचे चांगले उत्पादन शेतकऱ्यांना होत आहे. शिवाय शेतमालाची प्रतवारी देखील चांगली आहे.
