अमरावती : नाफेडद्वारा १ मार्चपासून हरभऱ्याची नोंदणी व खरेदी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ही खरेदी पुढील ६० दिवस राहणार आहे. आता प्रत्यक्षात तीन दिवस केंद्र बंद राहणार असल्याने ४ मार्चनंतरच हरभरा नोंदणीसह खरेदीच्या हालचाली वाढणार आहे. खरेदीमध्ये १४ टक्के आर्द्रतेचा निकष पुन्हा खोडा घालणार आहे.
नाफेडद्वारे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हरभरा खरेदीसाठीची ऑनलाइन नोंदणी व प्रत्यक्ष खरेदी १ मार्चपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने, शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. रबी हंगामासाठी हरभऱ्याला ५,८७५ रुपये प्रति क्विंटल असा किमान आधारभूत दर जाहीर केला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यात २१० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या बाजारात हरभऱ्याचे दर ५,१०० ते ५,४०० रुपये क्विंटलच्या दरम्यान असल्याने, शेतकऱ्यांचा कल नाफेडकडे नोंदणी करण्याकडे राहणार आहे. जिल्ह्यात १६ केंद्रांवर ही प्रक्रिया रंगपंचमी पश्चात बुधवारपासून गतिमान होईल.
नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक
शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीपूर्व नोंदणीसाठी अपडेट केलेला ७/१२ उतारा (ज्यावर हरभरा पिकाची नोंद अनिवार्य), आधार कार्डची छायाप्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स (बँक खाते आधारशी लिंक असावे), आधारशी लिंक मोबाईल आवश्यक आहे.
यंदा ७.६१ लाख टनाचे उद्दिष्ट
यावर्षी केंद्रीय कृषी मंत्रालयाने १ राज्यात ७.६१ लाख मे. टन हरभरा खरेदीला मंजुरी दिली आहे. पीक कापणीनंतर बाजारात आवक वाढल्यास दरात अधिक घसरण होण्याची शक्यता लक्षात घेता, वेळेत खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 'ई-समृद्धी' पोर्टलद्वारे ही प्रक्रिया 3 पारदर्शकपणे राबविली जाणार असून, चुकारे थेट शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
हरभऱ्याचे बाजारभाव (रु/क्विं)
- १८ फेब्रुवारी - ५००० ते ५५००
- २० फेब्रुवारी - ५२०० ते ५५५६
- २३ फेब्रुवारी - ५००० ते ५६००
- २५ फेब्रुवारी - ५००० ते ५३५६
- २७ फेब्रुवारी - ४८०० ते ५३५६
