वाशिम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि. ८ मे) रोजी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. (Washim APMC)
सकाळपासून मोठ्या प्रमाणात शेतकरीसोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीत दाखल झाले होते. मात्र दुपारी २ वाजेपर्यंत हराशी प्रक्रिया सुरू न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी थेट बाजार समिती परिसरात सोयाबीनची होळी करून निषेध नोंदविला.(Washim APMC)
शुक्रवारी सकाळपासूनच अनेक शेतकरी ट्रॅक्टर आणि वाहनांमधून सोयाबीन घेऊन बाजार समितीत आले होते. खरेदी प्रक्रिया वेळेत सुरू होईल, या अपेक्षेने शेतकरी उन्हाच्या तीव्र झळा सहन करत बाजार समितीत थांबले होते. मात्र, खरेदीदारांकडून सतत होत असलेल्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.(Washim APMC)
शेतकऱ्यांच्या मालाची वेळेत हराशी करा
दुपार उलटून गेल्यानंतरही हराशी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत बाजार समिती परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.
'शेतकऱ्यांच्या मालाची वेळेत हराशी करा', 'सोयाबीनला योग्य दर द्या', 'शेतकऱ्यांची पिळवणूक बंद करा' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
संतप्त शेतकऱ्यांनी निषेध म्हणून सोयाबीनची होळी केली. या घटनेमुळे काही काळ बाजार समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आंदोलनानंतर प्रशासनाची धावपळ
शेतकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनानंतर बाजार समिती प्रशासन आणि खरेदीदारांची धावपळ सुरू झाली. अखेर निषेधानंतर हराशी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मात्र सकाळपासून उन्हात थांबलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाजार समितीत वेळेत हराशी होत नसल्याने दिवसभर थांबावे लागते. त्यामुळे आर्थिक नुकसानासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
आंदोलनात अनेक शेतकरी सहभागी
या आंदोलनात सुनील कड, राजेश कड, विजय कड, संदीप माळेकर, प्रभू कड, केशव कड यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला वेळेत हराशी प्रक्रिया सुरू करण्याची आणि शेतमालाला योग्य दर मिळवून देण्याची मागणी केली आहे.
अधिक वाचा : Soybean Market Update : दर वाढले पण माल संपला; सोयाबीन बाजारात नेमकं काय घडलं?
