नंदुरबार : दरवर्षी शेतकऱ्यांना अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटांना सामोरे जावे लागते. यावर्षी केळी उत्पादक शेतकऱ्यांची अशीच अवस्था झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या केळीला मार्च महिन्यात व्यापारी केळी खरेदी करण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी झाडावरच पिकत असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होताना दिसत आहे.
फेब्रुवारी महिन्याचे पहिले पंधरा दिवस केळी पिकाला दोन हजार ते दोन हजार २०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. मात्र, शेवटच्या आठवड्यापासून दररोज शंभर ते दोनशे रुपये प्रति क्विंटल दर कमी होत गेला.
मार्च महिन्याच्या पहिल्या २०० ते एक हजार ३०० रुपये क्विंटलपर्यंत आला. मात्र, आजघडीला क्वचित ठिकाणी व्यापारी केवळ ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलने केळी खरेदी करताना दिसत आहेत. तेही अनेक शेतकऱ्यांना विनवणी करून खरेदी करण्यास सांगावे लागत आहे.
त्यामुळे व्यापारी मनमानी भाव करून केळीला नाममात्र ६०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल दर सांगत आहेत. तेही फोनवर आश्वासन देऊन अनेक दिवस व्यापारी केळी घेण्यासाठी येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी केळी झाडावरच पिकत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
खरेदीला टाळाटाळ
केळी काढणीचा हंगाम सुरू असतानाही अनेक व्यापारी केळी खरेदी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शेतकऱ्यांना फोनवर आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात व्यापारी केळी घेण्यासाठी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी केळी झाडावरच पिकत असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
