Tomato Market : नांदेड जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहेत. बाजारातटोमॅटोची आवक प्रचंड वाढली असली, तरी मागणीअभावी खरेदी मंदावली आहे. (Tomato Market)
शुक्रवारी स्थानिक बाजारपेठेत तब्बल २,००० ते २,५०० कॅरेट टोमॅटो विक्रीअभावी तसाच पडून राहिल्याचे चित्र दिसून आले. परिणामी, शेतकऱ्यांवर टोमॅटोचा 'लाल चिखल' करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.(Tomato Market)
पंधरा दिवसांत दर अर्ध्यावर
अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी टोमॅटोला प्रति कॅरेट २०० ते ३०० रुपये दर मिळत होता. मात्र, सध्या हा दर थेट ५० ते १०० रुपयांपर्यंत घसरला आहे.
बाजार समितीमध्ये टोमॅटो अवघ्या ४ ते ५ रुपये किलो दराने विकला जात असतानाही व्यापारी मोठ्या प्रमाणात माल उचलण्यास तयार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
एका कॅरेटमध्ये साधारण २० ते २२ किलो टोमॅटो असतो. एवढ्या कमी दरात विक्री झाल्यास उत्पादन खर्च, तोडणी, मजुरी आणि वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
बाहेरच्या राज्यांतही मागणी घटली
नांदेडचा टोमॅटो प्रामुख्याने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथे पाठविला जातो. मात्र सध्या या राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर आवक वाढल्याने बाहेरच्या मालाला उठाव मिळत नसल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून दिली जाते.
त्यामुळे नांदेडच्या बाजारातील माल साठून राहिला असून, निर्यातीचे मार्गही बंद पडल्यासारखी परिस्थिती आहे.
किरकोळ बाजारातही मंदी
किरकोळ बाजारात टोमॅटो ५ ते १० रुपये किलो दराने विकला जात असला तरी ग्राहकांची खरेदी अपेक्षित प्रमाणात वाढलेली नाही.
दर घसरूनही मागणी न वाढल्याने बाजारात मालाची रेलचेल कायम आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने भाव कोसळत असल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.
लाखोंचे नुकसान
सध्या बाजारात २,००० ते २,५०० कॅरेट माल तसाच पडून असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
काही शेतकरी माल परत नेऊन जनावरांना खाऊ घालण्याचा किंवा शेतातच टाकण्याचा विचार करत आहेत.
शासनाने तातडीने हस्तक्षेप करून बाजार स्थिर करावा, प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी किंवा किमान आधारभूत दर जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा 'लाल चिखल' ही उपमा प्रत्यक्षात उतरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
