सागर कुटे
राज्यात यंदा शेतकऱ्यांनी विक्रमी (Record-breaking) उत्पादन घेतले असले तरी बाजारभावाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार तृणधान्य, अन्नधान्य आणि तेलबिया पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. मात्र, दर घसरल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. (Shetmal Production)
राज्यात २०२४-२५ च्या खरीप व रब्बी हंगामात पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी तब्बल १५५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. (Shetmal Production)
त्याचे श्रेय पावसाच्या चांगल्या वितरणासह शेतकऱ्यांच्या नियोजनबद्ध मेहनतीला जाते. मात्र, या वाढीव उत्पादनाला बाजारात अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.(Shetmal Production)
राज्य सरकार व कृषी खात्याचा प्रयत्न फळाला आला असून, उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. मात्र, बाजारभाव टिकवण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणे अत्यावश्यक बनले आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळण्यासाठी भाव हमी, प्रक्रिया केंद्रे आणि शाश्वत खरेदीसारख्या यंत्रणांची गरज आहे.(Shetmal Production)
सोयाबीन उत्पादनात विक्रमी झेप
राज्यातील सोयाबीन उत्पादकांना यंदा आनंद आणि चिंता दोन्हींचा सामना करावा लागला. अतिवृष्टीमुळे काही भागांत पिकांचे नुकसान झाले तरीही एकूण उत्पादन ८३.६४ लाख टनांवर पोहोचले, जे मागील वर्षीपेक्षा १६ लाख टनांनी अधिक आहे. ५०.६९ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असून, हे आता राज्यातील सर्वाधिक घेतले जाणारे खरीप पीक बनले आहे.
सोयाबीन का पसंत ?
सोयाबीन हे तुलनेने कमी खर्चाचे आणि कमी काळात येणारे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर वाटते. कपाशीपासून हेक्टरी उत्पन्न ४० ते ५० हजार रुपये मिळते, तर चांगले बाजारभाव मिळाल्यास सोयाबीनपासून एक लाख रुपयांहून अधिक उत्पन्न शक्य आहे. मात्र, यंदा सोयाबीन दरात घट झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कपाशीची गाठ शंभरी पार
राज्याच्या पारंपरिक नगदी पिकांमध्ये कपाशीचा बोलबाला कायम आहे. यंदा १००.८० लाख गाठी उत्पादन नोंदले गेले, तर मागील वर्षी हे उत्पादन ८९.१८ लाख गाठी इतके होते. विशेष म्हणजे यंदा कपाशीचा पेरा घटलेला असतानाही उत्पादनात वाढ झाली आहे, याचे श्रेय योग्य हवामान आणि रोग नियंत्रणाला दिले जात आहे.
गहू पिकाचे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ६.५ लाख टन अधिक उत्पादन, एकूण २६.३५ लाख टन झाली आहे.
मका पिकाचे ३०.३१ लाख टनांनी उत्पादनात मोठी उडी घेतली आहे.
तूर पिकाचे उत्पादनात ३५३ टनांची वाढ झाली आहे.
अहवालातील आकडेवारी
पिके | २०२३-२४ | २०२४-२५ |
---|---|---|
तृणधान्य | १.०६ कोटी टन | १.४७ कोटी टन |
तेलबिया | ७० लाख टन | ८८ लाख टन |
अन्नधान्य | १.४७ कोटी टन | २.०० कोटी टन |
बाजारभावात घट
उत्पादनात वाढ झाली असली तरी सोयाबीन, कपाशी, मका व तुरीच्या बाजारभावात गेल्या काही महिन्यांत घसरण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले असून, यंदाच्या उत्पादनातून फारसा फायदा झाला नाही.
शेतकरी कुठे अडकतोय?
* उत्पादन चांगले पण दर कमी
* साठवणूक सुविधांचा अभाव
* प्रक्रिया उद्योगांशी थेट संपर्क नाही
* आधुनिक बाजारपेठेची गरज