नाशिक : शेतकऱ्यांसाठी निर्यातक्षम फळबागांची ऑनलाइन नोंदणी करणे आता अनिवार्य केले आहे. नाशिक जिल्ह्यातून द्राक्षांची परदेशात सर्वाधिक निर्यात होत असते. नाशिकचा भाजीपाल्याला दुबई, श्रीलंकेत निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्ह्यातून २२ डिसेंबरअखेर द्राक्षांच्या ५९४३ प्लॉटची नोंदणी ऑनलाइन झाली असून, ३८०४ हेक्टरवरील द्राक्ष युरोपात समुद्रमार्गे रवाना होतील. त्यातील ७० टक्के माल युरोपात पोहोचला आहे.
नाशिकमधून दुबईत लिंबू, हिरवी मिरची, कोथिंबिर, काकडी, गाजराची निर्यात कंटेनरद्वारे होत असून, विमानातून या देशांमध्ये हिरवा भाजीपाला निर्यात होत असल्याचे निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकाससिंग यांनी सांगितले. यासाठी आधी नोंदणी अनिवार्य आहे.
कशाची नोंदणी कधीपर्यंत ?
द्राक्ष प्लॉटची नोंदणी मार्चपर्यंत असते. नोंदणी १० ऑक्टोबरपासून सुरू होते. ३० डिसेंबरपर्यंत रेग्युलर फी असते. त्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत ५० रुपये प्रति प्लॉट फी असून, त्यानंतर १ जानेवारीपासून ३१ मार्चपर्यंत १०० रुपये फी भरावी लागते. जिल्ह्यातून २२ डिसेंबरअखेर द्राक्षांच्या ५९४३ प्लॉटची नोंदणी ऑनलाइन झाली आहे.
परदेशासाठी नोंदणी बंधनकारक
परदेशात फळे आणि भाजीपाला निर्यात करण्यासाठी अपेडाद्वारे नोंदणी करणे बंधनकारक आहे, जी एक सरकारी नोंदणी असून याशिवाय आयएफसी (आयात-निर्यात कोड) आणि फेसाइ परवाना यांसारखे इतर परवाने व प्रमाणपत्रे आवश्यक असतात, जेणेकरून तुमचे उत्पादन आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करू शकेल आणि निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर आवश्यकता पूर्ण होतील.
ज्या शेतकऱ्यांना युरोपीय देशांत द्राक्ष, डाळिंब अथवा भाजीपाला पाठवायचा असतो, त्यासाठी नोंदणी बंधनकारक आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्षांची निर्यात होत असते. विदेशात निर्यातीपूर्वी संबंधित कृषी अधिकारी बागांची तपासणी करतात.
- रवींद्र माने, जिल्हा कृषी अधीक्षक
