गोंदिया : रब्बीतील धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना २३ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्यास शासनाने मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढ मिळाल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला धान खरेदीचे उद्दिष्टसुद्धा ४ ते ५ लाख क्विंटलने वाढवून मिळणार असल्याची आहे. यामुळे धान विक्रीपासून वंचित असलेल्या १५ हजारावर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शासनाने यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला रब्बी हंगामात एकूण २० लाख ७९ हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. तर शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ६०,४७४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. मात्र, ४८ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केल्यानंतर फेडरेशनचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने धान खरेदी बंद करण्यात आली.
त्यामुळे नोंदणी केलेले १२ हजार आणि नोंदणीपासून वंचित असलेल्या ३ हजारावर शेतकऱ्यांचे धान घरी तसेच पडून असल्याने शेतकरी संकटात आले आहे. त्यामुळे रब्बीतील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देऊन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती.
त्याचीच दखल अन्न व नागरी पुरवठा विभागाने रब्बीतील धान विक्रीसाठी नोंदणी करण्याकरिता २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंबंधीचे आदेश सोमवारी (दि. १५) काढले आहे. रब्बीतील धान खरेदी ही २७ सप्टेंबरपर्यंत केली जाणार असून जवळपास ४ ते ५ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळण्याची शक्यता असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितले.
प्रथमच रब्बीतील खरेदी सप्टेंबरअखेरपर्यंत
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन दरवर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत शासकीय धान खरेदी करीत असते. त्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने धान खरेदीत अडचण येते. मात्र, यंदा शासनाने सुरुवातीलाच रब्बीतील धान खरेदीचे उद्दिष्ट कमी दिल्याने तीनदा मुदतवाढ देत सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत प्रथमच धान खरेदी करण्याची वेळ आली.
खासगी बाजारपेठेत धानाचे दर कमी
यंदा खासगी बाजारपेठेत धानाचे दर हे फार कमी आहे. तर हमीभावापेक्षा कमी दराने धानाची खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसत होता. त्यामुळेच शासनाने शेतकऱ्यांना हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करता यावी, यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याचा व मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.