Ramphal Market : हिवाळ्याच्या अखेरीस आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला रामफळांचा हंगाम सुरू झाला असून सोयगाव तालुक्यातील जरंडीसह परिसरातील आठवडे बाजारात या फळांची आवक वाढू लागली आहे. (Ramphal Market)
सध्या बाजारात रामफळांना १०० ते २०० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत असून, हा दर समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया शेतकरी विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.(Ramphal Market)
जरंडी व सोयगाव परिसरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला तसेच स्थानिक आठवडे बाजारात छोट्या परड्यांमधून रामफळांची विक्री करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.(Ramphal Market)
व्यापाऱ्यांमार्फत विक्री करण्याऐवजी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून अधिक दर मिळविण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. व्यापारी तुलनेने कमी दर देत असल्याने थेट विक्री हा अधिक फायदेशीर पर्याय ठरत असल्याचे शेतकरी सांगतात.(Ramphal Market)
उत्पादन वाढले, पण दर्जेदार फळांचे प्रमाण घटले
यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र, किडीच्या प्रादुर्भावामुळे फळधारणा काही प्रमाणात कमी झाली असून दर्जेदार फळांचे प्रमाण घटल्याची माहिती रामफळ उत्पादक शेतकरी विजय गोविंदा चौधरी यांनी दिली.
रामफळ हे नैसर्गिकरीत्या झाडावर पिकल्यावरच तोडावे लागते. कच्ची फळे तोडल्यास चव आणि दर्जावर परिणाम होतो. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बाजारात आवक होत नाही. पिकलेली किंवा अर्धपिकलेली फळेच बाजारात विक्रीसाठी आणली जात असल्याने दर टिकून आहेत.
आरोग्यदायी फळ म्हणून मागणी
'रामफळ' या फळाला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. गोड आणि चवदार असल्याने लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये याची मागणी आहे. रामफळात व्हिटॅमिन 'सी', व्हिटॅमिन 'ए', पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असते.
यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास सहाय्य होते. उच्च फायबरमुळे बद्धकोष्ठता व अपचनाच्या तक्रारी कमी होतात. नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात.
प्रक्रिया उद्योगाची गरज
रामफळापासून आइस्क्रीम, मिल्कशेक, रबडी, मिठाई अशा विविध पदार्थांची निर्मिती करता येते.
स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगातून अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो. यासाठी शेतकरी गटांना प्रशिक्षण व मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
बाजारात समाधानकारक दर आणि थेट विक्रीच्या पर्यायामुळे सोयगाव तालुक्यातील रामफळ उत्पादक शेतकरी सध्या उत्साहित आहेत. योग्य बाजारपेठ आणि प्रक्रिया सुविधा उपलब्ध झाल्यास या फळपिकातून भविष्यात अधिक उत्पन्नाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रामफळापासून आइस्क्रीम, मिल्कशेक, रबडी, मिठाई, असे अनेक पदार्थ तयार करता येतात. स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास शेतीपूरक उद्योगातून उत्पन्न मिळू शकते. यासाठी शेतकरी गटांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे.- विजय गोविंदा चौधरी, शेतकरी
हे ही वाचा सविस्तर : Tur Bajar Bhav : तूर बाजारात कुठे मिळाले ८ हजार पार भाव? वाचा सविस्तर
