जळगाव : साबुदाणा, शेंगदाणे, भगर, मखाना, फळे आणि दूध या उपवासाच्या खाद्यपदार्थाचे दर गतवर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. महाशिवरात्रीचा सण उद्यावर आला असताना बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थानी भाव खाल्ला आहे.
साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, शेंगदाणे, बटाटा, राजगिरा पीठ, मखाना, फळे, दूध, दही आणि सुकामेवा हे मुख्य पदार्थ उपवासासाठी वापरले जातात. मात्र, त्यातील बहुसंख्य खाद्यपदार्थाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
केळी, बटाटा चिप्सची मागणी वाढली
उपवासाच्या इतर पदार्थाच्या तुलनेत फराळी चिप्सला मोठी मागणी आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये केळी आणि बटाटा चिप्स लोकप्रिय असल्याने पाकीट बंद चिप्सची विक्री वाढली आहे. 'होम मेड' फराळ स्वस्त ठरत असून गृहिणींनी 'होम मेड' पदार्थाना पसंती दिली आहे.
शेंगदाण्याचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटले
अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदा गुजरात आणि दक्षिण भारतात शेंगदाण्याच्या उत्पादनात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात शेंगदाण्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत टंचाई निर्माण झाली असल्याने किमती वाढल्या आहेत.
जाणून घ्या फराळाचे दर (प्रतिकिलो)
- साखर ४५ रुपये किलो
- गोडेतेल १५५ रुपये किलो
- शेंगदाणे १६० रुपये किलो
- साबुदाणा ८० रुपये किलो
- भगर १५० रुपये किलो
- रताळे ६० रुपये किलो
- राजगिरा १०० रुपये किलो
भगरीत भेसळीची शक्यता
महाशिवरात्रीला भगरीची मागणी वाढते, याचाच फायदा घेत काही विक्रेते त्यात भेसळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पांढरी माती किंवा स्वस्त धान्याची भेसळ ओळखण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहाण्याची गरज आहे. काही वेळेस भेसळीमुळे त्रासही उद्भवण्याची भीती असते.
Kanda Market : सोलापूर, लासलगाव मार्केटमध्ये लाल कांदा दर कसे आहेत, आज सर्वाधिक आवक कुठे झाली?
