गोंदिया : शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते. यंदा शासनाने धानाला २,३६९ हमीभाव जाहीर केला आहे. पण, बाजारपेठेत धानाचे भाव पडले असून, १८०० ते २००० क्विंटलप्रमाणे धान खरेदी केली जात आहे.
तर, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे तांदळाची निर्यात ठप्प असल्याने त्याचा सुद्धा धानाचा दरावर परिणाम झाला आहे. शासकीय धान खरेदीची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. पण, शासनाने दिलेले धान खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून धान खरेदी ठप्प आहे. परिणामी शेतकऱ्यांची कोंडी झाली असून, त्यांना हमीभावापेक्षा कमी दराने धानाची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे.
लागवड, उत्पादन आणि धान खरेदी
जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात १ लाख २२ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. जवळपास ६० लाख क्विंटलवर धानाचे उत्पादन झाले. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शासकीय धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत ८२ हजार १२३ शेतकऱ्यांकडून २५ लाख ७९ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत ६११ कोटी १० लाख रुपये आहे.
२३६९ प्रति क्विंटल दर
शासनाने यंदा धानाला २३६९ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर हा दर मिळत असला, तरी बाजारपेठेत मात्र १८०० ते २००० हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी सुरू आहे. शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला अद्यापही धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले नाही. परिणामी बीम पोर्टलवर नोंदणी केलेले ५० हजार शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
शेतकऱ्यांना भाववाढीची होती आशा
यंदा धानाला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, आखाती देशातील युद्धामुळे तांदळाची निर्यात थांबल्याने तांदळाचे दर कोसळल्याने याचेच परिणाम धानाच्या दरावर झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर युद्धाने पाणी फेरल्याचे चित्र आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी नोंदणी केलेले शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शासनाकडे १० लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मागितले आहे.
- विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी.
