जितेंद्र फुटाणे
हिवरखेड परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही संत्रा हंगाम सुरू झाला असून उत्पादक शेतकरी आपला माल विक्रीसाठी बाजारात आणत आहेत.(Orange Market)
मात्र संत्र्याची क्रेटने विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या अटींमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.(Orange Market)
व्यापारी, मजूर आणि मध्यस्थ दलाल यांच्या संगनमतामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.(Orange Market)
हिवरखेड परिसरात संत्रा उत्पादक शेतकरी आपला माल विविध पद्धतीने विक्रीसाठी आणतात. काही शेतकरी संत्री हुंड्यात, काही टनाने तर काही क्रेटने विक्री करतात.(Orange Market)
मात्र क्रेटने व्यवहार करताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर विविध अटी लादल्या जात असल्याचे समोर येत आहे.
व्यापाऱ्यांकडून १०० क्रेटमागे ५ ते १५ क्रेटपर्यंत अतिरिक्त सूट मागितली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
याशिवाय संत्री टनाने विक्री करताना देखील शेतकऱ्यांना ५० ते १५० किलोपर्यंत अतिरिक्त सूट द्यावी लागते.
अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमुळे किंवा तातडीच्या गरजेमुळे या अटी मान्य करूनच माल विकण्यास भाग पडत असल्याचे चित्र आहे.
क्रेट पूर्ण भरून देण्याची सक्ती
क्रेटने संत्री विक्री करताना व्यापाऱ्यांकडून क्रेट पूर्ण भरून देण्याची सक्ती केली जाते. शेतकऱ्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यास व्यापाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
उलट शेतकऱ्यांचे नुकसान कसे होईल, याकडेच व्यापारी आणि काही मजुरांचे लक्ष असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
मजुरी व वाहतूक खर्चही वाढला
संत्रा हंगामात मजूर मिळणेही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या ठरत आहे. एका जोड मजुरीसाठी सुमारे ९०० रुपये सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून १,१०० ते १,५०० रुपये घेतले जात असल्याचे शेतकरी सांगतात.
त्यातच वाहतुकीसाठी गाडी भाडे देखील २०० ते ५०० रुपयांनी अधिक घेतले जात असल्याने उत्पादन खर्च वाढत आहे.
दलालांकडून कमिशन
या व्यवहारात मध्यस्थ व दलाल शेतकऱ्यांकडून २ ते ३ टक्के कमिशन घेत असल्याचे सांगितले जाते. मात्र कमिशन घेत असूनही हे दलाल व्यापाऱ्यांची बाजू घेत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे.
प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
व्यापारी, मजूर आणि मध्यस्थ यांच्या संगनमतामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी विभाग तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतमाल विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणून शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
