जळगाव : राज्यात सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणाऱ्या जळगाव जिल्ह्यासाठी अखेर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जळगावच्या केळीचे दर शेजारील मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या बाजारावर अवलंबून होते. मात्र, आता जिल्ह्यातील केळीचे दर जळगावातच निश्चित होणार आहेत.
यासाठी जिल्हा प्रशासनाने नऊ सदस्यीय विशेष समितीची घोषणा केली असून, यामुळे बऱ्हाणपूर बोर्डाची गेल्या अनेक वर्षाची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. मोठ्या जळगाव जिल्ह्यातून प्रमाणावर केळीची केवळ देशांतर्गत विक्रीच नव्हे, तर परदेशातदेखील निर्यात केली जाते. असे असताना जळगावचे केळीचे दर मात्र, बऱ्हाणपूरच्या बाजारभावानुसार ठरवले जात होते.
याबाबत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. स्थानिक बाजारपेठेनुसार दर निश्चित व्हावेत, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. अखेर जिल्हा प्रशासनाने या मागणीची दखल घेत अखेर यावर कायमस्वरूपी तोडगा काढत विशेष समिती नेमली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
नव्याने गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली ऑनलाईन बैठक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत आमदार अमोल जावळे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने आणि जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी हे देखील सहभागी झाले होते. या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, आतापासून जिल्ह्यातील केळीचे दर ही समितीच ठरवेल.
या निर्णयामुळे दरांमध्ये अधिक पारदर्शकता येईल आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना आता 'ब-हाणपूर बोर्डा'च्या लहरीपणावर अवलंबून राहावे लागणार नाही. स्थानिक परिस्थिती, गुणवत्ता आणि मागणीनुसार जिल्ह्याचा स्वतःचा दर फलक कार्यान्वित होणार आहे.
अशी आहे नऊ सदस्यीय विशेष समिती
बाजार समिती सभापती : रावेर, यावल, चोपडा, बोदवड येथील बाजार समित्यांचे सभापती
तज्ज्ञ प्रतिनिधी : जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील
निर्यातदार व प्रगतशील शेतकरी : विशाल अग्रवाल (रावेर), रामदास पाटील (निंबोल), प्रशांत महाजन (तांदळवाडी)
केळी उत्पादक व संशोधन केंद्र प्रतिनिधी : संदीप पाटील (केळी संशोधन केंद्र, वढोदा)
El Nino Effect : एल निनो म्हणजे काय, त्याचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होईल, यंदा पाऊस कसा राहील?
